Saturday, 26 July 2025

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न.



दौलतनगरदि.26:- ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राज्यातील महायुतीचे शासन प्रयत्नशील असून सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या योजना राबविण्याचे काम आपण पालकमंत्री म्हणून केले. त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करत या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामांसाठी निधीची तरतूद करुन या कामांना प्राथमिकता दिली. सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शिक्षण,आरोग्य व पाणी पुरवठा या तीन गोष्टींना प्राधान्य दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा होत असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

           तळमावले,ता.पाटण येथे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेतील 01 कोटी 25 लक्ष निधीतून पुर्णत्वाकडे गेलेल्या तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा सुविधांचे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी  बोलत होते.यावेळी  डॉ. दिलीपराव चव्हाण,संजय देसाई,पंजाबराव देसाई,विलास गोडांबे,धनाजी गुजार,अनिल शिंदे,नेताजी मोरे, मधुकर पाटील, सचिन यादव, नेताजी मोरे,सरपंच सुरज यादव,कविता कचरे,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद,कार्यकारी अभियंता अमर नलवडे,गटविकास अधिकारी सरिता पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कांबळे,उपअभियंता मयुर पवार, शाखा अभियंता संदिप पाटील यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

               यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून पाटण तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेत गत पंचवार्षिकमध्ये या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांसाठी  सातारा जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये भरीव निधीची तरतूद करत या कामांना सुरुवातही झाली.ही योजना राबविताना बारकाईने कामांचे नियोजन केले. आता टप्प्या टप्प्याने या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.याच योजनेच्या धर्तीवर प्राथमिक शाळा शहरातील शाळांप्रमाणे करण्याचे उद्देशाने आदर्श शाळा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व विस्तारणासाठी  मंजूर झालेल्या 1 कोटी 25 लक्ष निधीतून तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जेदार असे काम पूर्णत्वास गेले असून आज या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्‍न होऊन सर्व सामान्य रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, सर्व सामान्य रुग्णांसाठी चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हा वार्षिक आराखडयातून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामासाठी भरीव निधीची तरतूदही करत असल्याने ही कामे मार्गी लागत आहे.सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून राबविलेली ही योजना प्रत्यक्ष साकारत आहे याचे नक्कीच समाधान असून या तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सेवाभावी वृत्तीने प्रामाणिकपणे या विभागातील गोर-गरीब रुग्णांची सेवा करावी, जेणे करुन या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या कोणत्याही रुग्णाची हेळसांड होणार नाही आणि ज्या उद्देशाने ही योजना सुरु केली ती योजना यशस्वी झाल्याचे समाधान वाटेल असे सांगत आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता राखण्याची दक्षता घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना केल्या. विभागातील पदाधिकाऱ्यांनीही आरोग्य केंद्रामध्ये येऊन स्वच्छतेची पाहणी करावी.तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थानांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगत दर्जेदार काम झालेल्या या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा या विभागातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

चौकट: ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतील पहिले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले.

सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाई यांनी संपूर्ण सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही योजना राबवली.आज जिल्हयामध्ये सर्वत्र 50 च्या दरम्यान स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे सुरु असून पाटण तालुक्यामध्ये तळमावलेसह हेळवाक,मरळी,सोनवडे,मोरगिरी,चाफळ,केरळ,मुरुड व तारळे या नऊ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्यावत सोयी सुविधा पुरविण्याची  कामे सुरु असून तळमावले व हेळवाक या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्णत्वाकडे गेली असून पालकमंत्री म्हणून जिल्हास्तरावर राबविलेल्या या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनेत पालकमंत्री ना.शंभराज देसाई यांचे संकल्पनेतील पहिले तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र होऊन त्याचा ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते लोकार्पण होऊन सर्व सामान्य रुग्णांच्या सेवेत रुजू  झाले.

Friday, 18 July 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगरदि.18:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्येचांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2025-26 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाणृपांडूरंग नलवडे,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,लक्ष्मण बोर्गे, सर्जेराव जाधव,शशिकांत निकम,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,दिपाली पाटील,जयश्री कवर सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणे हे लोकनेते बाळासाहेब देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 चे गळीत हंगामामध्ये 205000 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.71% साखर उताऱ्याने 2,40,040 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिल मधील रोलरचे आज पूजन होत आहे. प्रतिवर्षी कारखाना गळीत हंगामामध्ये आलेल्या अडचणींवर मात करीत, यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करावे. आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कारखान्यातील अधिकारी कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे.तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कर्तृत्व पाहण्यासाठी मरळीच्या माळावर या...! शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार.

 


           लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्याचे काम शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांनी हयातभर केले. शिवाजीराव देसाई यांचे कार्य समजून घेण्यासाठी पाटण मतदारसंघातील डोंगर कपारीत राहणाऱ्या गोरगरिब वयोवृध्द नागरिकांची भेट घ्या तसेच त्यांनी अविरत कष्टाने फुलविलेल्या मरळीच्या माळावर या म्हणजे तुम्हाला शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा अंदाज येईल, असे आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी  केले आहे. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने खा. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल व अर्थहीन वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

             स्व.शिवाजीराव देसाई यांच्यावर आपल्या वडिलांचा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता.मुंबईमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येच व्यवसायास सुरूवात केली. व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झालेले असतानाच लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शिवाजीराव देसाई यांना पाटण मतदारसंघाची जबाबदारी देऊन तेथील गोरगरिब जनतेची सेवा करण्यास सांगितले. आपल्या पिताश्रींचा आदेश शिरसावंद्य मानून शिवाजीराव देसाई यांनी आपल्या व्यवसायाचा त्याग करून पाटणच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. पाटणमध्ये आल्यावर त्यांनी पाटण तालुक्यातील लोकांच्या हाती काम मिळावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, ऊसासारखे शेतात पीक घेवून त्यांच्या हाती पैसा यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव देसाई यांनी मरळीच्या माळरानावर जिथं कुसळ उगवत नाहीत अशा ठिकाणी साखर कारखाना काढण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले व केल्याने होत आहे रे.. आधि केलेची पाहिजे ...’ हा दूर दृष्टीकोन ठेवून त्यांनी लोकांच्या घरी जावून शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून १९७१-७२ साली पाटण तालुक्यात पहिला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना उभारला व अल्पावधीतच तो साखर कारखाना कर्जमुक्त करून शेतकऱ्यांच्या मालकीचा केला.

               पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांचे मागासलेपण दूर व्हावे म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना केली परंतु त्यामध्ये राजकारण येताच शिवाजीराव देसाई यांनी सोनवडे या ठिकाणी १९८३ साली मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाची गंगा मोरणा शिक्षण संस्थेच्या रूपाने पाटण तालुक्यात सुरू केल्यानंतर स्व.शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्यातील मुलांना व्यवसायिक शिक्षण मिळावे तसेच दर्जेदार कारागीर निर्माण व्हावेत यासाठी मरळीच्या माळरानावर दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना १९८६ साली केली. आज मोरणा शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला असून हजारो मुलांचे भवितव्य या ठिकाणी घडत आहे. अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शिवाजीराव देसाई यांनी पाटण तालुक्याचा कायापालट करीत तालुक्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले.

                   स्व.शिवाजीराव देसाई यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी मरळीच्या माळावर या व स्वतःच्या डोळ्याने शिवाजीराव देसाई यांचे कार्यकर्तृत्व पहा असे आवाहन जयवंराव शेलार यांनी पत्रकाव्दारे करत फक्त मुंबईत बसून आपल्या नेत्याला खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न बंद करा नाहीतर पाटणची जनता तेथे येऊन तुमच्या बुडाला आग लावल्याशिवाय शांत बसणार नाही, हे मात्र नक्की ! असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.