मुंबई, दि. ३ जुलै : एसआरए योजनांमध्ये पारदर्शकता, पात्र लाभार्थ्यांचे हित आणि दर्जेदार पुनर्वसनाला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. सभागृहात उपस्थित झालेल्या प्रत्येक तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेतील लक्ष्यवेधीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
आमदार सुनील कांबळे, शंकर जगताप, मनोज जामसुटकर, राम कदम, योगेश सागर, अजय चौधरी आणि विजय वडेट्टीवार यांनी एसआरए प्रकल्पांतील कथित अनियमितता, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, इमारतींचा दर्जा, क्लस्टर पुनर्विकास तसेच नियमांच्या अंमलबजावणीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.
आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील कोथरूड येथील गोसावी वस्ती एसआरए योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्री देसाई यांनी या प्रकल्पातील सर्व पात्रता प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पात कोणत्याही बोगस लाभार्थ्याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, प्राप्त होणाऱ्या तक्रारींची स्वतंत्र बैठक घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रकरणांवरही स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मनोज जामसुटकर यांनी टीडीआर, एफएसआय, अपील प्रकरणे आणि कथित अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी संबंधित सर्व माहिती सभागृहात उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. अपील प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. लेखी स्वरूपात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी एकत्रित करून त्यावर स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणाही त्यांनी केली.
आमदार राम कदम यांनी एसआरए इमारतींची देखभाल, संरक्षण विभागाच्या जमिनीवरील पुनर्विकास आणि क्लस्टर पुनर्विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी पुनर्वसन इमारतींच्या देखभाल व नागरी सुविधांसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. संरक्षण विभागाच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी एकाच खिडकीतून परवानगी देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.






