पाटण तालुक्यातील पाटण आणि मरळी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ६ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना महाव्यवस्थापक बांधकाम यांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बस स्थानकांचे सुशोभीकरण, अतिरिक्त प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि आगार परिसराचे आधुनिकीकरण या कामांचा यात समावेश आहे. या निधी मंजुरीमुळे तालुक्यातील हजारो एसटी प्रवाशांना दर्जेदार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असल्याचे प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण आगार हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणावला जोडणारे मध्यवर्ती आगार आहे. त्यामुळे या आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशी प्रवास करतात.पाटण येथील राज्य परिवहन आगाराच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आगार इमारतीचे बाह्य सुशोभीकरण, आगार व्यवस्थापक निवासस्थान, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन विद्युत कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कुंपण भिंत व प्रवेशद्वार, वाहनतळ काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसविणे या कामांचा समावेश आहे.आहे तर मरळी हे पाटण तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून लोकनेते बाळासाहेब देसाई महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारक व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरळी येथे असल्याने या स्थानकामध्ये ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर या बस स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्येमुळे स्थानकाच्या विकासाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मंजूर निधीमुळे या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. मरळी बस स्थानकाच्या विकासासाठी १ कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये तळमजल्याचे नूतनीकरण, बाह्य सुशोभीकरण, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, संरक्षक भिंत, आरसीसी रिटेनिंग वॉल, वाहनतळाचे काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे.
पाटण आणि मरळी स्थानकासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरीता पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सन 2014 पासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे . पाटण आगाराचे नुकतेच वाढीव फलकांचे उद्गाटन झाले आहे. तर मरळी बस स्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम चालू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक एसटी सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, यासाठी शंभूराज देसाई यांनी शासन व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल होता असे पत्रकात म्हटले आहे. या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.








