Tuesday, 7 July 2026

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.१२ जुलै रोजी दौलतनगर ता.पाटण येथे 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम.

 


       

दौलतनगर दि.7: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.१२ जुलै,२०26 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै, २०26 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा.महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा)यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम व मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम  नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा)  यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

Monday, 6 July 2026

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ तास सतर्क राहावे; शंभूराज देसाई यांचे निर्देश -सातारा जिल्हा प्रशासनान सतर्क


मुंबई, दि. ६ जुलै : संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, आरोग्य सेवक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी यांनी २४ तास क्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थान येथून सातारा जिल्ह्याची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.


या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधीक्षक अभियंता (सातारा सिंचन मंडळ) अभय काटकर, प्रांताधिकारी (पाटण) सोपान टोणपे, तहसीलदार (पाटण) अनंत गुरव, प्रांताधिकारी (वाई) योगेश खरमाटे, प्रांताधिकारी (सातारा) आशिष बारकूल, महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हरनुल तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा (कोयना बांधकाम मंडळ), महावितरण आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही जोखीम न पत्करण्याचे आवाहन केले आहे. आपले जीवन अमूल्य आहे. पर्यटनाचा आनंद पुन्हा घेता येईल; मात्र सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी आहे, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.


साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविणे, अतिधोकादायक धबधब्यांजवळील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवणे, नदी-नाल्यांच्या परिसरात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी निर्देशही त्यांनी दिले.


तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी सुरक्षित निवास, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि आवश्यक औषधसाठ्याची तत्काळ उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थितीचा वेळोवेळी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.

Friday, 3 July 2026

प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू – प्रभारी मंत्री शंभूराज देसाई

                                                                         


मुंबई, दि. ३ जुलै : एसआरए योजनांमध्ये पारदर्शकता, पात्र लाभार्थ्यांचे हित आणि दर्जेदार पुनर्वसनाला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. सभागृहात उपस्थित झालेल्या प्रत्येक तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेतील लक्ष्यवेधीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. 


आमदार सुनील कांबळे, शंकर जगताप, मनोज जामसुटकर, राम कदम, योगेश सागर, अजय चौधरी आणि विजय वडेट्टीवार यांनी एसआरए प्रकल्पांतील कथित अनियमितता, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, इमारतींचा दर्जा, क्लस्टर पुनर्विकास तसेच नियमांच्या अंमलबजावणीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.


आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील कोथरूड येथील गोसावी वस्ती एसआरए योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्री देसाई यांनी या प्रकल्पातील सर्व पात्रता प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पात कोणत्याही बोगस लाभार्थ्याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, प्राप्त होणाऱ्या तक्रारींची स्वतंत्र बैठक घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रकरणांवरही स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


आमदार मनोज जामसुटकर यांनी टीडीआर, एफएसआय, अपील प्रकरणे आणि कथित अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी संबंधित सर्व माहिती सभागृहात उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. अपील प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. लेखी स्वरूपात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी एकत्रित करून त्यावर स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणाही त्यांनी केली.


आमदार राम कदम यांनी एसआरए इमारतींची देखभाल, संरक्षण विभागाच्या जमिनीवरील पुनर्विकास आणि क्लस्टर पुनर्विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी पुनर्वसन इमारतींच्या देखभाल व नागरी सुविधांसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. संरक्षण विभागाच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी एकाच खिडकीतून परवानगी देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 



सभागृहाच्या प्रतिष्ठेसाठी शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य; मंत्री शंभूराज देसाई यांचा आग्रह

                                                                                  

मुंबई, दि. ३ जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातील शिस्त, संसदीय परंपरा आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाम भूमिका मांडली.

सदस्यांप्रमाणेच अधिकारी व प्रेक्षक गॅलरीतील सर्व संबंधितांनीही सभागृहाच्या नियमांचे आणि शिष्टाचारांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली.

सभागृहातील प्रत्येक घटकाने संसदीय परंपरांचा आदर राखणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. यापूर्वीही गॅलरीतील शिस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र अद्याप काही व्यक्ती गॅलरीत मोबाईलचा वापर करत किंवा बेशिस्तपणे बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारचे वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे असल्याने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

सभागृहात प्रवेश करणाऱ्या अधिकारी व इतर संबंधितांना शिस्तीचे नियम स्पष्टपणे समजावून सांगावेत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. सभागृहातील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेची दखल घेत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात येतील आणि शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

सभागृहाची प्रतिष्ठा, संसदीय शिष्टाचार आणि लोकशाही संस्थांचा गौरव कायम राखण्यासाठी शिस्तीचे पालन अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश मंत्री शंभूराज देसाई यांनी या हस्तक्षेपातून दिला.



Wednesday, 1 July 2026

उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडून पाटण नगरपंचायतीकरीता 04 कोटीं 50 लक्ष निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाना यश

 

 

दौलतनगर दि.30:- पाटण या तालुक्याच्या ठिकाणी  नगरपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये  आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे  निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता.मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या  विविध विकास कामांना 04.50 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि.29.06.2026 रोजी पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांची अनेक कामे गेली अनेक वर्ष प्रलंबित असल्याने येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सदरची नागरी सुविधांची कामे मंजूर होण्यासाठी मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती.या अगोदर ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांचे  विविध विकास कामासाठी राज्याचे नगरविकास विभागाने 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय दि.24.06.2026 रोजी पारित केला होता.तर पाटण नगरपंचायतीसाठी आणखी 04.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दि. 29.06.2026 रोजी पारित केला असून या शासन निर्णयानुसार पाटण नगरपंचायती अंतर्गत पुढीलप्रमाणे असणाऱ्या विविध विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये पाटण नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र.16 रामनगर येथे सभामंडप 20 लक्ष, प्रभाग क्र.06 लिंगायत समाज महादेव मंदीरासमोर सभामंडप 25 लक्ष, प्रभाग क्र.12 चाफोली  रस्ता वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले  दुतर्फा  पथदिवे बसविणे 30 लक्ष,प्रभाग क्र.13 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 20 लक्ष, प्रभाग क्र.14 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 20 लक्ष, प्रभाग क्र.15 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 30 लक्ष, प्रभाग क्र.17 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 40 लक्ष, प्रभाग क्र.03 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 20 लक्ष, प्रभाग क्र.9 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 20 लक्ष,प्रभाग क्र.06 मुस्लिम समाज कब्रस्तान येथे वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले पथदिवे बसविणे 15 लक्ष,प्रभाग क्र.06 मुस्लिन समाज कब्रस्थान विकसित करणे 15 लक्ष,प्रभाग क्र.7 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 25 लक्ष,प्रभाग क्र.4 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 30 लक्ष,प्रभाग क्र.16 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 20 लक्ष,प्रभाग क्र.6 वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत अनुज्ञेनय असलेले    पथदिवे बसविणे 25 लक्ष,प्रभाग क्र.17  खोराटे यांची बिल्डींग ते सुर्यवंशी यांचे धर ते जाफर मुल्ला यांचे  घर रस्ता 15 लक्ष,प्रभाग क्र.14 सुनंदा चव्हाण यांचे घर ते ज्ञानु चव्हाण यांचे घरापर्यंत रस्ता व प्रभाग क्र.14 पिरजादे यांचे घर ते लोहार यांचे शेतापर्यंत रस्ता सुधारणा 15 लक्ष,प्रभाग क्र.13 पाटील हॅास्पीटल ते गणेश कुलकर्णी यांचे घर ते मुबारक हकीम यांचे घरापर्यंत रस्ता 15 लक्ष,प्रभाग क्र.17  महादेव सुतार ते श्री. लोहार यांचे शेतीपर्यंत ग्रैव्हिटी गटर 30 लक्ष, प्रभाग क्र.03नितीन पिसाळ यांचे जागेपासून ते  विठ्ठल मंदीर रस्ता काँक्रीटीकरण 20 लक्ष असा एकूण 4.50 कोटींचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे.राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांना आत्तापर्यंत दोन टप्प्यांमध्ये 9.50 कोटींचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असल्याचे शेवठी पत्रकात म्हटले आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्पांसाठी धोरणात्मक सुधारणा मुंबईतील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणाऱ्या घरांसाठी शासन कटीबद्ध प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही


मुंबई, दि. ३० : मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. रखडलेल्या पुनर्विकास व पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याबरोबरच गिरणी कामगारांची घरे, जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांतील प्रश्न टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे प्रतिपादन प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभा सभागृहात केले. महाराष्ट्र गृहनिर्माण विभागावरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.


गृहनिर्माण व नगरविकास विभागाशी संबंधित विविध प्रश्न विरोधी पक्षातील सदस्यांनी उपस्थित केले. गृहनिर्माण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, गिरणी कामगारांची घरे, जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास तसेच पोलिसांच्या गृहनिर्माणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. 


तत्कालीन मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली समूह पुनर्विकास संकल्पना पुढे नेण्यात येत असून, या प्रस्तावांना एकखिडकी योजनेच्या माध्यमातून जलद मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रकल्पांचा नियमित आढावा घेत असल्याने पुनर्विकासाच्या कामांना गती मिळत आहे.


देसाई म्हणाले, दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील २ हजार ६१४ सदनिकांचे वितरण २००२ मध्ये झाले असून इमारतींची दुरवस्था लक्षात घेऊन आवश्यक दुरुस्ती व सुरक्षिततेची कामे करण्याच्या सूचना म्हाडाला देण्यात येतील. भविष्यात या परिसराच्या समूह पुनर्विकासाचाही विचार करण्यात येईल. गिरणी कामगारांना घरे वाटपाबाबत गृहनिर्माणचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे. मुंबईतील सुमारे १९ हजार ६४४ उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत कार्यवाही सुरू असून विकास नियंत्रण नियमांनुसार या कामांना गती देण्यात येत आहे.

राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सुमारे ४० लाख घरकुलांचा प्रस्ताव सादर केला असून मुंबईतील नोकरदार महिलांसाठी सुमारे १५० क्षमतेचे वसतिगृह उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनांद्वारे सुमारे ८ हजार भाडेतत्त्वावरील घरांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. चाकण येथील म्हाडा योजनेतील सदनिकांच्या किमतींचा फेरविचार सुरू असून, सेस इमारतींबाबत सक्षम प्राधिकरण म्हणून म्हाडाच राहावे, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास या संदर्भात कायद्यात दूरुस्ती करण्याचाही शासन विचार करेल, असे त्यांनी सांगितले.


नामदेववाडी आणि विठ्ठलवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत स्वतंत्र बैठक अधिवेशना दरम्यान किंवा त्यानंतर १५ दिवसांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. संबंधित आमदारांना या बैठकीस विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून त्यांच्या सूचनांचाही विचार केला जाईल. पोलिसांकडून नागरिकांवर दबाव टाकल्याच्या तक्रारींची तातडीने चौकशी करण्यात येईल, असे सांगून सभागृहातील सर्व सदस्यांनी केलेल्या विधायक सूचनांचा शासन गांभीर्याने विचार करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना.


मुंबई, दि. १ जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले प्रतापगडावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 


बैठकीत प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, वीर जिवाजी महाले स्मारकाची संकल्पना, निधीची उपलब्धता, जागेची निश्चिती तसेच प्रशासकीय मान्यतांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांच्या पराक्रमाचे जतन करताना पर्यटनालाही चालना मिळावी, या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. 


बैठकीत पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, पर्यटन विभागाच्या ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी 'छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी' हा पर्यटन विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडविणारे शिल्प, अॅम्फीथिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन, सुशोभीकरण आदी विविध कामांचा समावेश आहे. 


बैठकीदरम्यान वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाबाबत यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहाराचा आणि प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी अर्धाकृती पुतळ्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णाकृती पुतळा व स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव अंतिम करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचा गौरव करणे ही राज्याची जबाबदारी आहे. प्रतापगडावरील हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी सांगितले की, प्रतापगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून, जिवाजी महाले यांचे स्मारक उभारल्याने पर्यटकांना स्वराज्याच्या इतिहासाची अधिक प्रभावी माहिती मिळेल. यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक विकासालाही गती मिळेल.

बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. 


बैठकीच्या शेवटी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून स्मारक उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अद्वितीय शूरवीराला अभिवादन करणारा हा प्रकल्प राज्याच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.