Sunday, 12 July 2026

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

 

        दौलतनगर दि.12: पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले. दौलतनगर परिसरासह तालुक्यात विविध प्रकारची शैक्षणिक दालने उभी करून सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून स्व.शिवाजीराव देसाई यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी केली.

               ते  दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी व कै.सौ.वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, सभापती सौ.सविता विजय पवार,उपसभापती विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील,स्वप्ना पाटील, मृणाल पाटील,सुनिता चाळके,पंचायत समिती सदस्य पंबाजराव देसाई,सचिन यादव,मंगल माने,प्रियांका देसाई,प्रशांत पवार,नितीन काळे, ॲङ डी. पी. जाधव, प्रशांत पाटील,संतोष गिरी, अभिजित पाटील,भरत साळुंखे,चंद्रकांत पाटील,विजयराव देशमुख,बशीर खोंदू,बाळासो पाटील,विलास गोडांबे,प्रशांत पाटील, बळीराम साळुंखे, शंकरराव पाटील, सुरज चव्हाण,अधिकराव देसाई, सौ.दिपाली पाटील, श्रीमती जयश्री कवर, विजय सरगडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.सुहास देसाई यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी स्व.आबासाहेबांच्या पुतळ्यास तसेच समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षेत प्रत्येक केंद्रातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कै. सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

                यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सहकार व शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्व.आबासाहेब यांनी दिली. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला. स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी पाटण तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, हा ध्यास घेत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रेरणेतून कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही विरोधकांनी फसवणूक करून ती संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतरही न खचता स्व.आबासाहेबांनी मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच आयटीआय महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आज या संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक युवक पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतः शी स्पर्धा केली पाहिजे. ग्रामीण भागात मुल मुली अव्वल कामगिरी करत आहेत.शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम हा त्याच विचारांचा एक भाग आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार श्री.विजय पवार यांनी मानले.

Friday, 10 July 2026

वाठोडा येथील पंतप्रधान आवास योजनेतील सर्व कामे मानकांनुसार पूर्ण; कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. १० : नागपूर येथील वाठोडा परिसरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखडा, निविदेतील अटी-शर्ती आणि निर्धारित दर्जानुसार पूर्ण करण्यात आली असून, स्वतंत्र तांत्रिक तपासणीत कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नाही, अशी माहिती प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूरमधील वाठोडा परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल प्रकल्प आणि तेथील मूलभूत सुविधांबाबत आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, मौजा वाठोडा येथे २६४, नगर पंचायत बीडगाव (तरोडी खुर्द) येथे २,३७४ आणि खसरा क्रमांक ६२ येथे ९४२ अशी एकूण ३,५८० घरकुले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहेत.

या प्रकल्पामध्ये मंजूर आराखड्यानुसार कंपाऊंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंची दुकाने, कन्व्हिनियन्स शॉपिंग सेंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहिन्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रूम तसेच बाह्य विद्युतीकरणासह सर्व आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

एनएमआरडीएच्या १३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार संबंधित सेवा-सुविधा तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ६ मार्च २०२६ रोजी वृंदावन व एकता सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे विधिवत हस्तांतरित करण्यात आल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई म्हणाले की, या प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. संस्थेने केलेल्या तांत्रिक परीक्षण व लेखापरीक्षणामध्ये प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखड्यानुसार, निविदेतील सर्व अटी-शर्तींचे पालन करून आणि आवश्यक दर्जानुसार पूर्ण करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच कामांमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नसल्याचेही संस्थेने प्रमाणित केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार अथवा काम अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्रयस्थ तांत्रिक संस्थेनेही वाठोडा येथील प्रकल्पातील कामे मानकांनुसार आणि निविदेतील सर्व अटी-शर्तींप्रमाणे पूर्ण झाल्याचे प्रमाणित केले आहे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भातील सविस्तर माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असेही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

नेहरूनगर-टिळकनगर म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण उन्नतीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 


मुंबई, दि. १० : कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळकनगर, सहकारनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर व टिळकनगर येथील सुमारे ६० वर्षे जुन्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाबाबत आमदार मंगेश अनंत कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, के/पूर्व विभागातील नवीन टिळकनगर (चेंबूर), टिळकनगर (चेंबूर), नेहरूनगर (कुर्ला) आणि सहकारनगर (चेंबूर) येथील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी टप्पा-१ चे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी मुंबई महानगरपालिका आणि ५० टक्के निधी म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून, म्हाडाचा हिस्सा सुमारे २८५ कोटी रुपये आहे.

या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील १५ टक्के निधी एका महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित निधी कामाच्या प्रगतीनुसार आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागणीनुसार चार समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आमदार मंगेश कुडाळकर यांनी परिसरातील पुनर्विकासामुळे लोकसंख्या वाढणार असल्याने मलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. फेज-१ अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित कामे सुरू आहेत. तसेच फेज-२ ची कामे तातडीने सुरू करण्यासाठी म्हाडाने आवश्यक निधी मुंबई महानगरपालिकेकडे जमा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाच्या निधीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करत कामाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध करून दिला जाईल आणि प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सभागृहाला आश्वस्त केले.

Thursday, 9 July 2026

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. ९ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.

मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

हे स्मारक उभारल्यानंतर प्रतापगडाच्या शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश-विदेशातील पर्यटकांसाठी ते आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

Wednesday, 8 July 2026

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या बचावासाठी मंत्री शंभूराज देसाई धावले; आमदारांच्या प्रत्येक प्रश्नाला दिली समाधानकारक उत्तरे

मुंबई, दि. ७ : सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चॅरिटेबल रुग्णालयांतील गैरप्रकारांबाबत दिलेल्या उत्तरावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री तथा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई सभागृहात त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले.

राज्यमंत्री मिसाळ यांनी योग्य आणि वस्तुनिष्ठ उत्तर दिल्याचे स्पष्ट करत देसाई यांनी केवळ त्यांचा ठाम बचावच केला नाही, तर विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक पूरक प्रश्नाला सविस्तर, समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित रुग्णालयांवरील कारवाईची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची ग्वाही दिल्यानंतर विरोधकांनी अधिक कठोर भूमिका घेतली. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करत, राज्यातील सर्व चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड सक्तीने लावण्याचे आदेश आजच महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच जिल्हास्तरीय समित्यांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी न्यायालयीन प्रकरणांमध्ये वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीची मागणी केली असता, गरज भासल्यास विशेष शासकीय वकील नेमण्याचा विचार केला जाईल, अशी सकारात्मक भूमिका देसाई यांनी मांडली. आमदार राजीव पोतदार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व पात्र रुग्णालयांमध्ये सक्तीने राबविण्यात येतील, तसेच जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.


आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या एकत्रित डॅशबोर्डच्या सूचनेचे स्वागत करत महानगरपालिका आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र केंद्रीकृत डॅशबोर्ड विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर त्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर विद्यमान कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशाराही दिला.


आमदार बच्चू कडू यांनी कायद्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केल्यानंतर नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेऊन अधिक कडक नियमावली तयार करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर जिल्हास्तरीय समित्यांचे गठन तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांना पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.


आमदार भाई जगताप यांच्या सूचनेनुसार एका महिन्याच्या आत सर्व रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड लावण्याची मुदत देण्यात येईल, अन्यथा कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट करत देसाई यांनी शासनाची भूमिका ठामपणे मांडली. प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रश्नावर वर्मा मेडिकल रिसर्च ट्रस्टच्या नावानेच धर्मादाय मदत स्वीकारण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तर डॉ. मनिषा कायंदे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सभागृहातील संपूर्ण चर्चेदरम्यान शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तराचे समर्थन करत विरोधकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले. विविध सदस्यांच्या सूचनांचा स्वीकार करून कालबद्ध उपाययोजना, कठोर अंमलबजावणी आणि आवश्यक कायदेशीर बदलांची घोषणा केल्याने त्यांच्या उत्तरांना सभागृहात विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कनेक्टिंग लिंक दुर्घटनेची तज्ज्ञांकडून सखोल चौकशी; अहवालानंतर संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडणार – प्रभारी मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. ७ : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील दुर्घटनेप्रकरणी सरकारकडून तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेमागील कारणांसह संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्यात येईल. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी विधानसभेत प्राथमिक निवेदन केले आहे. दुर्घटनेनंतर बाधित मार्गावरील वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य होते. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या. कालपासून मार्गाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, आज सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवरील संपूर्ण वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

कनेक्टिंग लिंक हा अत्याधुनिक आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्याचे देश-विदेशात कौतुक झाले आहे, असे नमूद करून श्री. देसाई म्हणाले की, दुर्घटना घडलेल्या परिसरात अल्पावधीतच नेहमीपेक्षा चौपट ते पाचपट अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीचाही सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. तथापि, केवळ त्यावर अवलंबून न राहता तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करून दुर्घटनेची नेमकी कारणे शोधण्यात येतील.

चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सविस्तर आढावा सभागृहासमोर मांडला जाईल. 

तसेच जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात पारदर्शकता राखून वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण – मंत्री शंभूराज देसाई



मुंबई, दि. ७ जुलै : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद सुलभ करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उद्योग विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केले.

मंत्री श्री. देसाई यांनी हे विधेयक सभागृहापुढे सविस्तर मांडताना सांगितले की, विद्यमान कायद्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) बाह्य स्रोतांद्वारे कर्ज उभारण्याची कमाल मर्यादा ७५ कोटी रुपये आहे. मात्र, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने ही मर्यादा अपुरी ठरत आहे. 

त्यामुळे महामंडळाची कर्ज उभारणीची मर्यादा ७५ कोटी रुपयांवरून ६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद या सुधारणा विधेयकाद्वारे करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सुधारणेद्वारे उभारण्यात येणारे कर्ज केवळ पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी सुमारे ८५ टक्के भूसंपादन परस्पर संमतीने पूर्ण झाले असून, उर्वरित भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधत असल्याची माहिती त्यांनी दिली.

चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुरंदर विमानतळासाठी जागेची निवड भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या तांत्रिक सल्ला व व्यवहार्यता अहवालाच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करत पारदर्शक आणि सहमतीच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महामंडळाची आर्थिक क्षमता, कर्ज परतफेडीची क्षमता आणि प्रकल्पाची वित्तीय व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास करूनच ही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई यांनी राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. 

सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी विधेयकाला सभागृहाने संमती द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर सभागृहाने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ संमत केले.