Wednesday, 15 July 2026

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा. चेअरमन मा.यशराज देसाई(दादा). लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात चेअरमन मा.यशराज देसाईंचे हस्ते रोलरचे पुजन.

 


दौलतनगरदि.15:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्येचांगली वाटचाल करत आहे. सध्या आपल्या कारखान्याचे विस्तारवाढ पूर्ण झाली असून यंदाचे गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु आहे. कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पुर्ण केला होता. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवले आहे. नियोजनबध्द काम करुन सन 2026-27 चा गळीत हंगाम प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.

                दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2026-27 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन  कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील, पांडूरंग नलवडे, सुरज चव्हाण,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,अधिक देसाई पदाधिकारी, कार्यकारी संचालक एस.एल.देसाई यांचेसह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               यावेळी बोलताना चेअरमन यशराज देसाई (दादा) पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत आपले उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला कारखाना उत्तरोत्तर चांगली प्रगती करत आहे. सभासद शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचवणे हे लोकनेते बाळासाहेब देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्न आपल्या उद्योग समुहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 चे गळीत हंगामामध्ये 195602 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.59% साखर उताऱ्याने 2,26,700 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाकरीता यंत्रसामग्री देखभाल दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट नियेाजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिल मधील रोलरचे आज पूजन होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे कारखाना गळीत हंगामात यशस्वी गळीत करण्याची आपल्या कारखान्याची परंपरा यापुढेही अशीच ठेवण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम करावे. आपला हा कारखाना सभादांचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांना एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस तोडणी मजूर, कारखान्यातील अधिकारी कर्मचारी यांचे सांघिक प्रयत्नातून येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नियोजनबध्द काम करावे. तसेच आपले कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला गळीतास देऊन येणार गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Monday, 13 July 2026

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभे राहणार असल्याचे समाधान.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई

 

        दौलतनगर दि.12: अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य,स्वाभिमान,राष्ट्रनिष्ठा आणि त्याग याचे सर्वोच्च प्रतिक आहे. या स्वराज्याच्या निर्मितीस आणि संरक्षणासाठी असंख्य मावळयांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यामधील वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्याबाबत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे हे आग्रही होते.तसेच सामाजिक व शिवप्रेमी संघटना यांचे सातत्याच्या मागणीचा विचार करुन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्याच्या पर्यटन  विभागाकडून सातारा जिल्हयातील प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभे राहणार  असल्याचे समाधान आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  केले.

       दौलतनगर ता.पाटण येथे वीर जिवजी महाले यांच्या स्मारकासाठी अवघ्या आठ दिवसांत निधीची तरतूद करुन सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा मतदारसंघातील समस्त नाभिक समाजाच्यावतीने आयोजित जाहिर सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई, मा.रविराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, जयवंतराव शेलार, संजय देशमुख, अशोकराव पाटील, सभापती सौ.सविता विजय पवार,उपसभापती विजय पवार, पंबाजराव देसाई,स्वाभिमानी नाभिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अधिकराव चव्हाण,पाटण तालुका अध्यक्ष विक्रम महिपाल,हरी माने,वल्लभ कदम,अनिल कदम,निलेश कदम,मनोहर सपकाळ,सोमनाथ काशिद,नवनाथ माने,दादा ढवळे,दिलीप पवार,दाजी सुर्वे,संदेश संपकाळ,विष्णू साळूंखे,संतोष यादव,निखिल चव्हाण,राजू कदम,विजय चव्हाण,कमलाकर भांदिर्गे व सतिष सपकाळ यांचे सह पाटण विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाजातील महिला,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.तत्पुर्वी नाभिक समाजाचेवतीने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.

           यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान यांच्या दरम्यान झालेल्या ऐतिहासिक भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या सय्यद बंडास अचूक वेळी ठार करुन वीर जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले होते.महाराजांच्या केसालाही धक्का लागला नाही. वीर जिवाजी महाले यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे आणि समयसुचकतेमुळे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सुरक्षित राहिला. त्या अनुषंगाने होता जिवा म्हणून वाचला शिवा ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अमर पराक्रमाची साक्ष देणारी असून आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जातो. या सोहळयासाठी दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक,इतिहास संशोधक,विद्यार्थी आणि शिवप्रेमी किल्ले प्रतापगडावर भेट देत असतात. त्यामुळे किल्ले प्रतापगडाचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्टया महत्तव वाढत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, वीर जिवाजी महाले यांच्या अव्दितीय पराक्रमाला चिरंतन स्वरुप देण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांचे भव्य स्माकर उभारण्याची सातत्याने मागणी होत होती.तसेच उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनीही मानस व्यक्त केला होता.या मागणीनुसार वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचा वारसा अधोरेखित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन महायुतीच्या शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी पर्यटन विभागाच्या जागेत वीर जिवाजी महाले यांचे भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत या स्मारकाचे उभारण्याकरीता प्रथम टप्प्यातील कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच लवकरच या स्मारक उभारण्यासंदर्भात जिल्हयातील नाभिक संघटनांच्या पदाधिकारी यांचेशी चर्चा करुन एक जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येईल आणि या स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल.असे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नाभिक समाजाची केवळ एकच संघटना कार्यरत आहे ही बाब चांगली असून आपल्या समाजाची एकजूट खूप महत्तवाची आहे. यापुढील काळामध्ये नाभिक समाजाने आपली एकजूट कायम ठेवून राहिलेले प्रलंबित मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.प्रास्ताविक दौलत कदम यांनी तर आभार सतिश माने यांनी मानले.

Sunday, 12 July 2026

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

 

        दौलतनगर दि.12: पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले. दौलतनगर परिसरासह तालुक्यात विविध प्रकारची शैक्षणिक दालने उभी करून सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून स्व.शिवाजीराव देसाई यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी केली.

               ते  दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी व कै.सौ.वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, सभापती सौ.सविता विजय पवार,उपसभापती विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील,स्वप्ना पाटील, मृणाल पाटील,सुनिता चाळके,पंचायत समिती सदस्य पंबाजराव देसाई,सचिन यादव,मंगल माने,प्रियांका देसाई,प्रशांत पवार,नितीन काळे, ॲङ डी. पी. जाधव, प्रशांत पाटील,संतोष गिरी, अभिजित पाटील,भरत साळुंखे,चंद्रकांत पाटील,विजयराव देशमुख,बशीर खोंदू,बाळासो पाटील,विलास गोडांबे,प्रशांत पाटील, बळीराम साळुंखे, शंकरराव पाटील, सुरज चव्हाण,अधिकराव देसाई, सौ.दिपाली पाटील, श्रीमती जयश्री कवर, विजय सरगडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.सुहास देसाई यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी स्व.आबासाहेबांच्या पुतळ्यास तसेच समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षेत प्रत्येक केंद्रातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कै. सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

                यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सहकार व शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्व.आबासाहेब यांनी दिली. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला. स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी पाटण तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, हा ध्यास घेत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रेरणेतून कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही विरोधकांनी फसवणूक करून ती संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतरही न खचता स्व.आबासाहेबांनी मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच आयटीआय महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आज या संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक युवक पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतः शी स्पर्धा केली पाहिजे. ग्रामीण भागात मुल मुली अव्वल कामगिरी करत आहेत.शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम हा त्याच विचारांचा एक भाग आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार श्री.विजय पवार यांनी मानले.

Friday, 10 July 2026

वाठोडा येथील पंतप्रधान आवास योजनेतील सर्व कामे मानकांनुसार पूर्ण; कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. १० : नागपूर येथील वाठोडा परिसरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखडा, निविदेतील अटी-शर्ती आणि निर्धारित दर्जानुसार पूर्ण करण्यात आली असून, स्वतंत्र तांत्रिक तपासणीत कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नाही, अशी माहिती प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

नागपूरमधील वाठोडा परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल प्रकल्प आणि तेथील मूलभूत सुविधांबाबत आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, मौजा वाठोडा येथे २६४, नगर पंचायत बीडगाव (तरोडी खुर्द) येथे २,३७४ आणि खसरा क्रमांक ६२ येथे ९४२ अशी एकूण ३,५८० घरकुले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहेत.

या प्रकल्पामध्ये मंजूर आराखड्यानुसार कंपाऊंड वॉल, योगा सेंटर, नित्योपयोगी वस्तूंची दुकाने, कन्व्हिनियन्स शॉपिंग सेंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहिन्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग, मीटर रूम तसेच बाह्य विद्युतीकरणासह सर्व आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

एनएमआरडीएच्या १३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार संबंधित सेवा-सुविधा तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ६ मार्च २०२६ रोजी वृंदावन व एकता सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे विधिवत हस्तांतरित करण्यात आल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई म्हणाले की, या प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. संस्थेने केलेल्या तांत्रिक परीक्षण व लेखापरीक्षणामध्ये प्रकल्पातील सर्व कामे मंजूर आराखड्यानुसार, निविदेतील सर्व अटी-शर्तींचे पालन करून आणि आवश्यक दर्जानुसार पूर्ण करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच कामांमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी अथवा अनियमितता आढळून आलेली नसल्याचेही संस्थेने प्रमाणित केले आहे.

त्यामुळे या प्रकल्पात कोणताही गैरव्यवहार अथवा काम अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्रयस्थ तांत्रिक संस्थेनेही वाठोडा येथील प्रकल्पातील कामे मानकांनुसार आणि निविदेतील सर्व अटी-शर्तींप्रमाणे पूर्ण झाल्याचे प्रमाणित केले आहे, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भातील सविस्तर माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असेही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

नेहरूनगर-टिळकनगर म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण उन्नतीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

 


मुंबई, दि. १० : कुर्ला (पूर्व) येथील नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळकनगर, सहकारनगर परिसरातील म्हाडा वसाहतीमधील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर व टिळकनगर येथील सुमारे ६० वर्षे जुन्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाबाबत आमदार मंगेश अनंत कुडाळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, के/पूर्व विभागातील नवीन टिळकनगर (चेंबूर), टिळकनगर (चेंबूर), नेहरूनगर (कुर्ला) आणि सहकारनगर (चेंबूर) येथील मलनिस्सारण वाहिन्यांच्या उन्नतीकरणासाठी टप्पा-१ चे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी मुंबई महानगरपालिका आणि ५० टक्के निधी म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असून, म्हाडाचा हिस्सा सुमारे २८५ कोटी रुपये आहे.

या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील १५ टक्के निधी एका महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित निधी कामाच्या प्रगतीनुसार आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागणीनुसार चार समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी आमदार मंगेश कुडाळकर यांनी परिसरातील पुनर्विकासामुळे लोकसंख्या वाढणार असल्याने मलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. फेज-१ अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित कामे सुरू आहेत. तसेच फेज-२ ची कामे तातडीने सुरू करण्यासाठी म्हाडाने आवश्यक निधी मुंबई महानगरपालिकेकडे जमा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पाच्या निधीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करत कामाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध करून दिला जाईल आणि प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सभागृहाला आश्वस्त केले.

Thursday, 9 July 2026

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. ९ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.

मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

हे स्मारक उभारल्यानंतर प्रतापगडाच्या शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश-विदेशातील पर्यटकांसाठी ते आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.