Thursday, 9 July 2026

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. ९ :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.

मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

हे स्मारक उभारल्यानंतर प्रतापगडाच्या शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश-विदेशातील पर्यटकांसाठी ते आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वासही मंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

Wednesday, 8 July 2026

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या बचावासाठी मंत्री शंभूराज देसाई धावले; आमदारांच्या प्रत्येक प्रश्नाला दिली समाधानकारक उत्तरे

मुंबई, दि. ७ : सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चॅरिटेबल रुग्णालयांतील गैरप्रकारांबाबत दिलेल्या उत्तरावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री तथा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई सभागृहात त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले.

राज्यमंत्री मिसाळ यांनी योग्य आणि वस्तुनिष्ठ उत्तर दिल्याचे स्पष्ट करत देसाई यांनी केवळ त्यांचा ठाम बचावच केला नाही, तर विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक पूरक प्रश्नाला सविस्तर, समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देत शासनाची भूमिका स्पष्ट केली.


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित रुग्णालयांवरील कारवाईची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची ग्वाही दिल्यानंतर विरोधकांनी अधिक कठोर भूमिका घेतली. त्यावेळी शंभूराज देसाई यांनी हस्तक्षेप करत, राज्यातील सर्व चॅरिटेबल रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड सक्तीने लावण्याचे आदेश आजच महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच जिल्हास्तरीय समित्यांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी न्यायालयीन प्रकरणांमध्ये वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीची मागणी केली असता, गरज भासल्यास विशेष शासकीय वकील नेमण्याचा विचार केला जाईल, अशी सकारात्मक भूमिका देसाई यांनी मांडली. आमदार राजीव पोतदार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व पात्र रुग्णालयांमध्ये सक्तीने राबविण्यात येतील, तसेच जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.


आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या एकत्रित डॅशबोर्डच्या सूचनेचे स्वागत करत महानगरपालिका आणि जिल्हास्तरावर स्वतंत्र केंद्रीकृत डॅशबोर्ड विकसित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर त्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर विद्यमान कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशाराही दिला.


आमदार बच्चू कडू यांनी कायद्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केल्यानंतर नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेऊन अधिक कडक नियमावली तयार करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर जिल्हास्तरीय समित्यांचे गठन तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांना पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.


आमदार भाई जगताप यांच्या सूचनेनुसार एका महिन्याच्या आत सर्व रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड लावण्याची मुदत देण्यात येईल, अन्यथा कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट करत देसाई यांनी शासनाची भूमिका ठामपणे मांडली. प्रमोद जठार यांनी उपस्थित केलेल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या प्रश्नावर वर्मा मेडिकल रिसर्च ट्रस्टच्या नावानेच धर्मादाय मदत स्वीकारण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तर डॉ. मनिषा कायंदे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक पाहणी आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सभागृहातील संपूर्ण चर्चेदरम्यान शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उत्तराचे समर्थन करत विरोधकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले. विविध सदस्यांच्या सूचनांचा स्वीकार करून कालबद्ध उपाययोजना, कठोर अंमलबजावणी आणि आवश्यक कायदेशीर बदलांची घोषणा केल्याने त्यांच्या उत्तरांना सभागृहात विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कनेक्टिंग लिंक दुर्घटनेची तज्ज्ञांकडून सखोल चौकशी; अहवालानंतर संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडणार – प्रभारी मंत्री शंभूराज देसाई


मुंबई, दि. ७ : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील दुर्घटनेप्रकरणी सरकारकडून तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेमागील कारणांसह संपूर्ण वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडण्यात येईल. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी विधानसभेत प्राथमिक निवेदन केले आहे. दुर्घटनेनंतर बाधित मार्गावरील वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य होते. त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या. कालपासून मार्गाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, आज सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या कनेक्टिंग लिंकवरील संपूर्ण वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

कनेक्टिंग लिंक हा अत्याधुनिक आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्याचे देश-विदेशात कौतुक झाले आहे, असे नमूद करून श्री. देसाई म्हणाले की, दुर्घटना घडलेल्या परिसरात अल्पावधीतच नेहमीपेक्षा चौपट ते पाचपट अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 

त्यामुळे नैसर्गिक परिस्थितीचाही सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. तथापि, केवळ त्यावर अवलंबून न राहता तज्ज्ञांकडून सखोल चौकशी करून दुर्घटनेची नेमकी कारणे शोधण्यात येतील.

चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सविस्तर आढावा सभागृहासमोर मांडला जाईल. 

तसेच जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात पारदर्शकता राखून वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण – मंत्री शंभूराज देसाई



मुंबई, दि. ७ जुलै : पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद सुलभ करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उद्योग विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केले.

मंत्री श्री. देसाई यांनी हे विधेयक सभागृहापुढे सविस्तर मांडताना सांगितले की, विद्यमान कायद्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) बाह्य स्रोतांद्वारे कर्ज उभारण्याची कमाल मर्यादा ७५ कोटी रुपये आहे. मात्र, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने ही मर्यादा अपुरी ठरत आहे. 

त्यामुळे महामंडळाची कर्ज उभारणीची मर्यादा ७५ कोटी रुपयांवरून ६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद या सुधारणा विधेयकाद्वारे करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सुधारणेद्वारे उभारण्यात येणारे कर्ज केवळ पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी सुमारे ८५ टक्के भूसंपादन परस्पर संमतीने पूर्ण झाले असून, उर्वरित भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधत असल्याची माहिती त्यांनी दिली.

चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुरंदर विमानतळासाठी जागेची निवड भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या तांत्रिक सल्ला व व्यवहार्यता अहवालाच्या आधारे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करत पारदर्शक आणि सहमतीच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महामंडळाची आर्थिक क्षमता, कर्ज परतफेडीची क्षमता आणि प्रकल्पाची वित्तीय व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास करूनच ही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई यांनी राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. 

सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी विधेयकाला सभागृहाने संमती द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर सभागृहाने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा विधेयक, २०२६’ संमत केले.


Tuesday, 7 July 2026

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.१२ जुलै रोजी दौलतनगर ता.पाटण येथे 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम.

 


       

दौलतनगर दि.7: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.१२ जुलै,२०26 रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वा पुण्यतिथी कार्यक्रम रविवार दि.१२ जुलै, २०26 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा.महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा)यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम व मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम  नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा)  यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर ता.पाटण येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.

Monday, 6 July 2026

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ तास सतर्क राहावे; शंभूराज देसाई यांचे निर्देश -सातारा जिल्हा प्रशासनान सतर्क


मुंबई, दि. ६ जुलै : संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, आरोग्य सेवक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी यांनी २४ तास क्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील मेघदूत या शासकीय निवासस्थान येथून सातारा जिल्ह्याची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.


या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधीक्षक अभियंता (सातारा सिंचन मंडळ) अभय काटकर, प्रांताधिकारी (पाटण) सोपान टोणपे, तहसीलदार (पाटण) अनंत गुरव, प्रांताधिकारी (वाई) योगेश खरमाटे, प्रांताधिकारी (सातारा) आशिष बारकूल, महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हरनुल तसेच सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा (कोयना बांधकाम मंडळ), महावितरण आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि कोणतीही जोखीम न पत्करण्याचे आवाहन केले आहे. आपले जीवन अमूल्य आहे. पर्यटनाचा आनंद पुन्हा घेता येईल; मात्र सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी आहे, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.


साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविणे, अतिधोकादायक धबधब्यांजवळील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवणे, नदी-नाल्यांच्या परिसरात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी निर्देशही त्यांनी दिले.


तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी सुरक्षित निवास, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि आवश्यक औषधसाठ्याची तत्काळ उपलब्धता सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थितीचा वेळोवेळी अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या.

Friday, 3 July 2026

प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू – प्रभारी मंत्री शंभूराज देसाई

                                                                         


मुंबई, दि. ३ जुलै : एसआरए योजनांमध्ये पारदर्शकता, पात्र लाभार्थ्यांचे हित आणि दर्जेदार पुनर्वसनाला शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. सभागृहात उपस्थित झालेल्या प्रत्येक तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेतील लक्ष्यवेधीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. 


आमदार सुनील कांबळे, शंकर जगताप, मनोज जामसुटकर, राम कदम, योगेश सागर, अजय चौधरी आणि विजय वडेट्टीवार यांनी एसआरए प्रकल्पांतील कथित अनियमितता, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, इमारतींचा दर्जा, क्लस्टर पुनर्विकास तसेच नियमांच्या अंमलबजावणीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.


आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील कोथरूड येथील गोसावी वस्ती एसआरए योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावर मंत्री देसाई यांनी या प्रकल्पातील सर्व पात्रता प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पात कोणत्याही बोगस लाभार्थ्याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, प्राप्त होणाऱ्या तक्रारींची स्वतंत्र बैठक घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रकरणांवरही स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


आमदार मनोज जामसुटकर यांनी टीडीआर, एफएसआय, अपील प्रकरणे आणि कथित अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी संबंधित सर्व माहिती सभागृहात उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. अपील प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुनावणी घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. लेखी स्वरूपात प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी एकत्रित करून त्यावर स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणाही त्यांनी केली.


आमदार राम कदम यांनी एसआरए इमारतींची देखभाल, संरक्षण विभागाच्या जमिनीवरील पुनर्विकास आणि क्लस्टर पुनर्विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर मंत्री देसाई यांनी पुनर्वसन इमारतींच्या देखभाल व नागरी सुविधांसाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. संरक्षण विभागाच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी एकाच खिडकीतून परवानगी देण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.