Saturday, 5 April 2025

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत येराड येथील विविध जलपर्यटनाचे कामांना 4 कोटी 95 लक्ष निधी मंजूर. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत जेट्टी,बोट थांबा,पर्यटक केंद्र,स्वच्छतागृह इ.कामे विकसित होणार.


 

दौलतनगर दि.05:- महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील हेळवाक ते पापर्डे या दरम्यान जलपर्यटन हा प्रकल्प साकारात आहे. जलपर्यटन वाढीस चालना देण्याकरीता कोयना नदीकाठी येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने विविध विकास कामांना  मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना  नदीकाठी येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने जेट्टी,बोट थांबा,काठावरील पर्यटक केंद्र,स्वच्छता गृह ई. बांधकाम करण्याच्या कामांना 4 कोटी 95 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने  पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यता आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील हेळवाक ते पापर्डे दरम्यान जल पर्यटन प्रकल्प होण्यासाठी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार हेळवाक व पापर्डे या ठिकाणी दोन बोटींग स्पॉट निश्चित करण्यात येऊन जलपर्यटनाच्यादृष्टीने या दोन स्पॉट  विकसित करण्याकरीता आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली  आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारत असलेल्या या जलपर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणारा हा जलपर्यटन प्रकल्प पाटण मतदारसंघात साकारत आहे. हेळवाक ते पापर्डे दरम्यान एक बोट थांबा विकसित करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सर्व संबंधित अधिकारी यांना घेऊन कराड चिपळूण महामार्गावरील महाराष्ट्रातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या येराड ता.पाटण येथील श्री येडाबा मंदिर परिसरातील कोयना नदी काठी असलेल्या जागेची  प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती.त्यानंतर सर्व शासकीय अधिकारी यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये जलपर्यटनाच्यादृष्टीने बोट थांबा विकसित करण्यासाठी  येराड हे ठिकाण निश्चित करुन बोट थांबा विकसित करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी  जी विकास कामे मार्गी लावणे गरजेचे आहे अशा विकास कामांचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा अशा सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या.तद्नंतर सदरचा बोट थांबा विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यानंतर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना नदीकाठी येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये जलपर्यटनाच्या अनुषंगाने  आवश्यक असलेल्या विकास कामांना 4 कोटी 95 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने  पारित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून श्री येडोबा मंदिर येराड परिसरामध्ये बोट थांबा विकसित करण्यासाठी जेट्टी,बोट थांबा,काठावरील पर्यटक केंद्र,स्वच्छता गृह ई. बांधकाम करण्यासारखी कामे मार्गी लागणार असून राज्यासह इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी  विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर केलेल्या निधीचा शासन निर्णय हा समस्थ ग्रामस्थ मंडळ येराड यांना सुपुर्द केला.

 

चौकट: ना.शंभूराज देसाई यांनी श्रध्देपोटी प्रादेशिक पर्यटन योजनेधून पहिला निधी श्री येडोबा देवस्थानला मंजूर.

           कराड चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्रातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या येराड येथील श्री येडोबा मंदिर या ठिकाणी दररोज हजारो भाविक भक्त हे भेट देत असतात. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांची पहिल्यापासून येराड येथील श्री येडोबा देवावर श्रध्दा असल्याने ते शुभकार्याप्रसंगी पहिल श्री येडोबा चरणी नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतात. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून क वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या श्री येडोबा मंदिराच्या परिसरामध्ये विविध विकासाची कामे मार्गी लागली असून भाविक भक्तांना विविध सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.दरम्यान ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये जलपर्यटनासाठी  महत्त्वपूर्ण असलेला बोट थांबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून विकसित होणार असल्याने येराड येथील श्री येडोबा मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.तसेच येराड येथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर राहणार असल्याने पर्यटकांची गैरसाय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी श्री येडोबा देवावरील  श्रध्देपोटी प्रादेशिक पर्यटन योजनेमधील पहिला निधी श्री येडोबा देवस्थान परिसरातील कामांसाठी मंजूर केला आहे. 

Thursday, 3 April 2025

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल कालावधीत आयोजन -पालकमंत्री शंभूराज देसाई






                डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती होण्यासाठी कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


             पालकमंत्री श्री, देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे हे आयोजन करण्यात येणार आहे. 


            या प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडेस्वार, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी यांचा पर्यटन वाढीसाठी वापर करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा डोंगरी विभागातील शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वासही पालकमंत्री  देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 


            पत्रकार परिषदेपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या आयोजनासाठी जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते



लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्याचा चित्ररथ व गौरवयात्रा निघणार.


दौलतनगर दि.03:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर, ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन रविवार दि.२० एप्रिल ते बुधवार दि. २३ एप्रिल,२०२5 पर्यंत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले आहे. तत्पुर्वी शनिवार दि.9 एप्रिल,२०२5 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२5 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२5 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये करण्यात आले आहे. रविवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन पाटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. श्री.शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.

हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना शनिवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे तसेच विविध शासकीय विभागांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा, सोनाईचीवाडी, नावडी, निसरे फाटा, मल्हारपेठनवारस्ता, आडूळपेठ, आडूळ गावठाण, येरफळे, पाटणपर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून पाटण येथे या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे.

या पारायण सोहळयात ह.भ.प. पुंडलीक महाराज कापसे आळंदीकर हे व्यासपीठ चालक असून रविवार दि. २० एप्रिल २०२5 रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज कारंजकर तासगाव यांचे प्रवचन, ह.भ.प. तुकाराम हजारे महाराज अथणी बेळगाव यांचे किर्तन, सोमवार दि. २१ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प. वासुदेव गुरव महाराज, चिपळूण यांचे प्रवचन तर ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे,संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंसज यांचे किर्तन आणि मंगळवार दि.२२ एप्रिल, २०२5 रोजी ह.भ.प रविंद्र महाराज लोहार,अध्यक्ष गुरुकुल श्री ज्ञानेबाराय वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र करंडी ता.सातारा  यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीमहंत पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 42 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त बुधवार दि. २३ एप्रिल २०२5 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई (मॉसाहेब), मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. अमोल पाटील महाराज,संस्थापक अध्यक्ष श्री संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था गिरेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे सोळावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर, पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 42 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे. 

Tuesday, 1 April 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे २ मे २०२५ रोजी उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.


या महोत्सवात स्थानिक लोक संस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल. 


महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतींची आठवण करुन देतात. या ठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिद्धी आहे


पर्यटकांसाठी  पर्यटन महोत्सव कालावधीत विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असून येथे ५० निवासी टेंट पर्यटक आणि मान्यवरांसाठी उपलब्ध होणार आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.