Wednesday, 17 December 2025

मोरणा गट देसाई गटाचा बालेकिल्ला अभेद्य ठेवा- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आवाहन.

 

                                                                 



दौलतनगर प्रतिनिधी दि. 17: पाटण विधानसभा मतदारसंघातील मोरणा विभागाच्या विकास कामांसाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास निधी देण्यासाठी कुठेही कमी पडलो नाही व यापुढे कमी पडणार नाही. या जिल्हा परिषद गटातील मतदार हा साधा भोळा असून अत्यंत प्रामाणिक असून या विभागातील जनतेने मला पडत्या काळातही मनापासून साथ दिली आहे.मोरणा विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला अभेद्य राहील यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुकीत संघटितपणे काम करावे,असे आवाहन राज्याचे पर्यटन खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले .

          पेठशिवापूर (मोरगिरी),ता.पाटण येथे पाटणकर गटातून सुनील मोरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून सुरेश पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला .यानिमित्ताने आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते .यावेळी शंभूराज देसाई यांचे बंधू रविराज देसाई, सुग्रा खोंदू, विष्णू देसाई,डी.वाय.पाटील,नथूराम कुंभार, बशीर खोंदू, किसन गालवे, गणेश भिसे, प्रविण पवार, विजय सुर्वे, शिवाजी कोळेकर, संदिप कोळेकर, विलास मोरे, संपत कोळेकर,किशोर गुरव,नथुराम सावंत,विजय पवार,संतोष गिरी,आनंदा मोहिते,अविनाश नाझरे,शामराव पवार,प्रशांत पवार,मधुकर शिंदे तसेच मोरणा विभागातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते .

           यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने पाटण तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर गाजवले. सन 1952 ते 1970 पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार सोबत राज्याचे मंत्री म्हणून त्यानंतर सन 1977 ते 1980 या दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द गाजवली .त्यांच्या अनेक विकास कामांचा महाराष्ट्रभर गौरव झाला. मात्र पाटण विधानसभा मतदारसंघाकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष देऊन लोकांना केंद्रबिंदू मानून काम केले .त्यांनी कधी हेवेदाव्याचे गटातटाचे राजकारण केले नाही .सलग चार पिढ्या पाटणच्या जनतेची सेवा करणाऱ्या देसाई घराण्याची लोकसेवेची ही परंपरा आहे .विरोधक त्यांच्या काळामध्ये पाटण तालुक्यात टंचाई असताना केवळ देसाई गटाची गावे म्हणून पाणी देत नव्हते .मात्र आपण कधीही गटातटाचे राजकारण केले नाही.प्रत्येक आठवडयाला होणाऱ्या जनता दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची कामे प्रामाणिकपणे केली जातात.भले त्या व्यक्तीने विरोधात काम करू दे अथवा मला कधी मतदान केलेले नसू दे मात्र त्याचे काम झाल्यानंतरचा वृद्धिंगत होणारा विश्वास हीच खरी जमेची बाजू आहे .जनतेचा विश्वास कमवणे यासाठी पिढ्यानपिढ्या जाव्या लागतात. सन 2022 नंतर आम्ही जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर लोकांनी विश्वास ठेवला आणि खरी शिवसेना ही ना.एकनाथ शिंदे यांचेकडेच राहिली .प्रत्येक वेळेला पक्षाची बाजू विधानसभेत मांडण्यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली .आज आपण सत्तेत आहोत सातारा जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे . मोरणा भागातील माझा मतदार अत्यंत प्रामाणिक आहे. पडत्या काळातही या मोरणा विभागाने मनापासून साथ दिली आहे .मोरणा भागाच्या विकासासाठी आणि येथे विकास निधी देण्यासाठी मी पालकमंत्री या नात्याने कुठेही कमी पडणार नाही .येत्या महिनाभरामध्ये सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील .या तालुक्यातून जे इच्छुक आहेत त्यांनी आपली राजकीय इच्छा रीतसर आमच्याकडे नोंदवावीत,उमेदवारीबाबत सर्वानुमते निर्णय होईल.यापुढे विजयाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे जे निकष आहेत त्यामध्ये बसणाऱ्या इच्छुकांना संधी दिली जाईल असे सुतोवाच देसाई यांनी केले .मोरणा गट कार्यकर्त्यांनी संघटितपणे मजबूत ठेवावा हा भाग देसाई गटाचा यापूर्वीही बालेकिल्ला होता आणि भविष्यातही राहील यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करावे उगाच वैयक्तिक हेवेदावे ठेवून एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न करू नयेत असे आवाहन त्यांनी केले . पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी ही योजना राबवणारा 261 पाटण विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एकमेव मतदार संघ आहे .पालकमंत्री या नात्याने माझ्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाटण तालुक्यातील 90 गावांमध्ये 4000 लोकांची भेट घेतली .आणि त्यांची लोक आवश्यक कामे 62% पूर्ण केली . पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर आमचे विरोधकही आमच्या योजनांची कॉपी करत आहेत .किती आम्हाला कॉपी कराल ? अमुक अमुक दादा आपल्या दारी अशा घोषणा उठत आहेत हा प्रकार म्हणजे आमच्या योजनेची सरळ सरळ कॉपी आहे असा टोला शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावत जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक आता मतदारांकडे जाऊ लागले आहेत विधानसभा निवडणुका नंतर हे कोठे होते ? असा सवाल शंभूराजे यांनी केला .त्यांच्यावर बोलून मला त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही असाही टोला त्यांनी लगावला .जो नेता सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करतो त्यालाच जनतेचे प्रेम मिळते पाटण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानूनच काम करावे असे आवाहन त्यांनी केले .सुरेश पाटील व सुनील मोरे व त्यांचे सहकारी यांना पक्षांमध्ये नवे जुने काही वाटणार नाही आपण सर्वजण एकत्रित खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत अशी स्पष्ट ग्वाही शंभुराज देसाई यांनी दिली .

 

No comments:

Post a Comment