Friday, 24 October 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याला गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000/- रुपये पहिली उचल.

 

दौलतनगर दि.24:-गत दोन वर्षामध्ये कारखान्याचे विस्तारवाढ वेळेत पूर्ण झाल्याने गतवर्षीचा गळीत हंगाम आपल्या कारखान्याने कमी कालावधीत पूर्ण केला. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील अन्यत्र होणाऱ्या ऊसाचे प्रमाणही कमी करुन संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाने चांगले आर्थिक नियोजन  करावे. तसेच शासनाकडून देण्यात आलेल्या भाग भांडवलामुळे कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले असून यापुढील काळातही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाकडून मदत लागल्यास राज्य शासनाकडून कायम सहकार्य राहिल,असे आश्वासन ना.शंभूराज देसाई यांनी दिले.

           ते दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 2 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई,चि.जयराज देसाई,अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील, शशिकांत निकम,सर्जेराव जाधव,सुनिल पानस्कर,बळीराम साळुंखे,विजय सरगडे,शंकरराव पाटील,भागोजी शेळके, बबनराव शिंदे, लक्ष्मण बोर्गे,जयवंतराव शेलार, ॲङडी.पी.जाधव, अभिजित पाटील, चेअरमन संजय देशमुख,प्रकाशराव जाधव,जालंदर पाटील,विजय जंबुरे,माणिक पवार,कार्यकारी संचालक सुहास देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती. या वेळी 1 ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासद यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. गळीत हंगाम शुभारंभा निमित्त कारखान्याच्या संचालिका सौ. दिपाली विश्वास पाटील व त्यांचे पती श्री. विश्वास आत्माराम पाटील यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.

        याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षी माहे मे महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत असून मोठया प्रमाणांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने महाराष्ट्र शासनाने 32 हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहिर करत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत केली.ज्या प्रमाणे शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांची तिच परिस्थिती आहे.त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने जबाबदारी स्विकारुन अन्यत्र जाणाऱ्या ऊसाला आळा घालण्याचे काम करावे.दरम्यान राज्यामध्ये 1250 मे.टन गाळप क्षमतेचे अनेक कारखाने लिलावात गेले,विक्रीला निघाले परंतु लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासात आजही आपला कारखाना हा चांगले आर्थिक नियोजनामुळे सक्षमपणे सुरु असून भविष्यातही चांगल्या पध्दतीने सुरु राहिल.शासनाने मंजूर केलेल्या भागभांडवलामध्ये कारखान्याची चांगल्या पध्दतीने क्षमतवाढ करुन यशस्वी गळीत हंगाम केला.तारळे भागामध्ये शासन खर्चाने 50 मीटर व 100 मीटर हेडवरुन शेतीला पाणी  दिल्यामुळे बागायत क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. तर मोरणा गुरेघर बंदिस्त पाईप लाईनमधून डाव्या व उजव्या तिरावरुन शेतीला पाणी  देण्यासाठीचे काम प्रगतीपथावर असून नाटोशी उपसा सिंचन योजनेतून कारखाना परिसरामध्ये जादा ऊसाचे क्षेत्र लागवडीखाली येणार असल्याने कारखान्याचे जादा गाळप होण्यास मदत होणार असून यंदाच्या वर्षी प्र.मे.टन तीन हजार रुपये पहिली उचल आणि एफ.आर.पी.प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गळीतास येण्यासाठी सर्वांनी  सहकार्य करुन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी  सर्वांनी प्रयत्नशील रहावे,असे शेवटी आवाहन केले.

            याप्रसंगी बोलताना चेअरमन मा.यशराज देसाई म्हणाले की, पहिल्यांदाच पावसाच्या वातावरणामध्ये आपण गळीत हंगामाची सुरुवात करत आहोत.माहे मे पासून अवकाळी पाऊस मोठया प्रमाणांत पडत असल्याने ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असून ऊसाची उपलब्धता लक्षात घेता हा गळीत हंगाम आपण सुरु करत असताना कितीही आर्थिक ताण आला तरी  कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच ऊस विकास विभागामार्फत ऊस बियाणे,खते वाटप करण्याचे नियोजन केले आहे. ऊस तोडणी यंत्रणा हजर होत असून भागवाईज ऊस तोडणी मजूर टोळयांचे नियोजन केले आहे. पूर्ण ऊस तोडणी मजूर यंत्रणा आल्यानंतर पूर्ण क्षमतेने कारखाना सुरु करण्याचा मानस असून आपला कारखाना हा लहान असला तरी  जिल्हयातील इतर मोठया कारखान्यांच्या तुलनेमध्ये दर देण्याचा निर्णय घेतला असून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

चौकट:- ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल दिल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

           लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी आर्थिक शिस्त लावत काटकसरीचे धोरण अवलंबल्याने अल्पावधीमध्ये कारखान्याची विस्तारवाढीचे काम पूर्ण करुन कारखाना गाळप क्षमता 1250 वरुन 2500 मे.टन करत गत गळीत हंगाम यशस्वी पार पडला. तर आज कारखान्याचे 52 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी सन 2025-26 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्यास गळीतास येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन 3000 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment