Friday, 13 April 2018

पाणी टंचाईच्या बाबतीत अधिका-यांनी अजिबात हयगय करु नये. आमदार शंभूराज देसाई यांच्या अधिका-यांना सुचना.

पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.सुमारे ३२ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये ४१ विधंन विहीरीची आवश्यकता असून याचा मार्चअखेर करण्यात आलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला असून यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करणेसंदर्भात दि.६ एप्रिल रोजीच जिल्हाधिकारी,सातारा यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली आहे त्यानुसार प्रत्यक्ष स्थळपहाणी करणेकरीताचे पथकही देण्यात आले आहे.अजुनही काही ठिकाणी विंधन विहीरीं तसेच नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीची आवश्यकता असेल तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने माहे एप्रिल,मे महिन्यामध्ये टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीताचा पुरवणी आराखडा सादर करुन तो जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही परंतू पाणी टंचाईच्या बाबतीत संबंधित अधिका-यांनी अजिबात हयगय करु नये अशा सूचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना केल्या.
       आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती पाटणच्या सभागृहात माहे एप्रिल, मे महिन्यामध्ये जाणवणा-या पाणी टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीता व पाणी टंचाई मुक्तीकरीता लागणारा निधी आणण्याकरीता प्रस्ताव तयार करुन सादर करण्याची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी तहसिलदार रामहरी भोसले, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर.व्ही.पाटील व त्यांचे सर्व शाखा अभियंता, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,आशिष आचरे,सौ.सुग्रा खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,संतोष गिरी,सौ.निर्मला देसाई,सौ. सीमा मोरे,सौ.सुभग्रा शिरवाडकर, माजी सदस्य बशीर खोंदू, बबनराव भिसे,यांच्यासह पाणी टंचाई जाणवणारे गावातील ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक,ग्रामविसतार अधिकारी,तलाठी मंडल अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माहे डिसेंबर पासून माहे एप्रिल, मे महिन्यापर्यंत तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागात डोंगरपठारावर पाणी टंचाई जाणवणा-या गांवाना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई जाणवू नये याकरीता आराखडा तयार करुन तो सादर करण्यात आला आहे यामध्ये पाच ते सहा गांवानाच एप्रिल, मे महिन्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.सध्या एक दोन गांवाना टँकरने पाणी देण्यात येत आहे.तसेच ज्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्त्या करावयाच्या आहेत त्याचाही आराखडा सादर करण्यात आला आहे.तसेच विंधन विहीरींची मोठया प्रमाणात मागणी टंचाई जाणवू म्हणून अनेक गांवानी आणि वाडयावस्त्यांनी केली आहे त्यानुसार एकूण ३२ गांवे व वाडयावस्त्यांना ४१ ठिकाणी विंधन विहीरी देण्याची मागणी आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची दि.०६ एप्रिल रोजीच भेट घेतली आहे त्यांनी तात्काळ अशा ठिकाणांची स्थळपहाणी करुन याठिकाणी विंधन विहीरी देणेबाबतचे आदेश संबधित यंत्रणांना दिले आहेत याचा पाठपुरावा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी करावा पाणी टंचाईमुक्तीकरीता लागणारा निधी आणण्यास मी कुठेही कमी पडणार नाही असे सांगून ते म्हणाले, माहे एप्रिल आणि मे ते जुन पर्यंत टंचाई जाणवणा-या अजुनही काही गांवाची आणि वाडयावस्त्यांची मागणी असेल तर या गावांचे पाणी टंचाईचे प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून याचाही पुरवणी आराखडा तयार करावा यामध्ये ज्याठिकाणी विहिरींचे उद्भव बळकटीकरण करणे, विहिरीमध्ये पाण्याची वाढ होण्याकरीता आडवी बोअर मारणे याची आवश्यकता असेल तर याचाही समावेश या पुरवणी आराखडयात करावा अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. त्यानुसार बैठकीस उपस्थित असणारे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पुरवणी आराखडा तयार करणेसंदर्भातील कामे सुचीत केली त्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करणेसंदर्भात आमदार देसाई यांनी आदेश दिले. उपस्थितांचे स्वागत तहसिलदार रामहरी भोसले यांनी केले,आभार गटविकास अधिकारी संजीव गायकवाड यांनी मानले.
चौकट:- निमंत्रण देवूनही राष्ट्रवादीचे जि.प.व पं.स सदस्य बैठकीस गैरहजर, पाणीटंचाईतही राजकारण.

तालुक्यातील पाणी टंचाईसंदर्भात तालुक्यातील ग्रामस्थांबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांना या बैठकीकरीता निमंत्रित करावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना केल्या होत्या.या बैठकीस निमंत्रण देवूनही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व राष्ट्रवादीचे जि.प.आणि प.स.सदस्य हे गैरहजर असल्याने पाणी टंचाईमध्येही याठिकाणी राजकारण पहावयास मिळाले.



No comments:

Post a Comment