Tuesday, 17 July 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून संपूर्ण एफआरपी रक्कम बँकखाती वर्ग.



दौलतनगर दि.17:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2017-18 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. कारखान्याने प्रतिटन 25६७ रुपयांप्रमाणे एफआरपीची संपूर्ण रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने मागील सन 2017-18 च्या गळीत हंगामात गाळप होणा-या ऊसासाठी शेतकरी सभासदांना प्रतिटन 2750 रुपये दर जाहिर केला होता. एफआरपीनुसार प्रतिटन 2567 रुपये दर कारखान्याकडून देय होता त्यानुसार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या दि. 09 नोव्हेंबर ते दि.15 डिसेंबर या काळात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन 2750 रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे. तर दि.16 डिसेंबर ते दि.15 मार्च 2018 या काळात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन 2500 रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे.
दरम्यान त्यानंतर साखर दराच्या घसरणीमुळे व साखर उद्योगावर कोसळलेल्या संकटामुळे सर्वच साखर कारखान्यांसमोर ऊसबिलाचे पैसे कसे अदा करायचे ? हा प्रश्न आवासून उभा होता. पण आमचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने मात्र शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन आलेल्या परिस्थितीचा योग्य नियोजनातून सामना करत केंद्र व राज्यसरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण एफआरपी रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि.16 डिसेंबर 2017 ते दि.15 मार्च 2018 अखेर गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी दर फरकाची प्रतिटन 67/- रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये 91 लाख 79 हजार व दि.16 मार्च 2018 ते हंगाम संपेपर्यंत गाळप झालेल्या ऊसबिलापोटी एफआरपीनुसार प्रतिटन 2567 रुपयांप्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम रुपये 2 कोटी 93 लाख 51 हजार अशी एकूण रुपये 3 कोटी 85 लाख 30 हजार इतकी रक्कम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. ऊस उत्पादक शेतक-यांना लवकरच त्यांच्या ऊसाची रक्कम बँकेतून देण्याची तरतूद कारखान्याने केली असल्याचेही चेअरमन पाटील यांनी पत्रकात दिली आहे.



पाऊस वाढला आहे, तालुका प्रशासनाने सतर्क रहा. - आमदार शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.



दौलतनगर दि. 17:  पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून तालुक्यातील सर्व धरणे पाण्याने तुंटुंब भरली आहेत. कोयना धरणातही पाण्याचा मोठया प्रमाणात ओघ सुरु असून कोयना धरण हे सुमारे 76 टीएमसीकडे गेले आहे.80 टीएमसी पाणी भरलेनंतर कोयना धरण व्यवस्थापनाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.नवजा,कोयनानगर व महाबळेश्वर याठिकाणी मोठा पाऊस होत असल्याने यंदाच्या वर्षी एक महिना अगोदरच कोयना धरणात पाणीसाठा जादा प्रमाणात झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील तारळी,वांग मराठवाडी,मोरणा गुरेघर व उत्तरमांड धरणप्रकल्पातून धरणे पुर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पावसाच्या पाण्यामुळे कोयना नदीसह तालुक्यातील इतर नदयाही दुथडी भरुन वाहू लागल्या असून कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झालेनतंर कोयना नदीतील पाण्याची पातळी वाढणार असल्याने तालुका प्रशासनाने सतर्क आणि जागृत रहावे अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
                     पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असल्याने व तालुक्यातील धरणातील पाण्याच्या पातळीत झपाटयाने वाढ होत असल्याने पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे सुचनेवरुन त्यांचे अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे तालुका प्रशासनाला सुचना केल्या. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,उपअभियंता मोरे,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस.जी. हिरे,गायकवाड,सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे, पाटणचे प्रभारी पोलीस निरीक्षक पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे,गटशिक्षणाधिकारी निकम,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत यादव,सार्वजनीक बांधकाम व जिल्हा बांधकाम विभागाचे सर्व शाखाअभियंता यांचेबरोबर तालुकास्तरीय सर्व विभागांचे विभागप्रमुख यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
                     याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांचेकडून कोयना धरणातील पाणीसाठयासंदर्भात व पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेतली यावेळी पाटील यांनी 80 टीएमसी पाणीसाठा धरणात झालेनंतर पाण्याचा विसर्ग सुमारे 30 हजार कयुसेक्स नी करणार असल्याचे निदर्शनास आणून दिलेनंतर मुळातच कोयना नदीपात्रात पावसाच्या पाण्यामुळे कोयना नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे.त्यातच धरणातील पाणी विसर्ग केल्यानंतर नदीपात्रात पाण्याची वाढ होणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या गांवाना सतर्क राहण्याच्या सुचना यंत्रणेने तात्काळ दयाव्यात अशा सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी दिल्या.कोयना नदीकाठी असणा-या पाटण येथील कळके चाळ, जमदाडवाडी,मंद्रुळहवेली व नावडी या गांवाना लगेच पाणी लागते त्यामुळे जागृत रहावे. धरणातील जलसाठयाच्या व पाणी विसर्गाच्या निर्णयात आम्हाला कोणाला हस्तक्षेप करावयाचा नाही परंतू कोयना धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग करताना योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहाययक पोलीस निरीक्षक, सार्वजनीक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी २४ तास अलर्ट रहावे.आपले विभागाकडील अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये संबधित अधिकारी वर्गाने करावयाची असून संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षात दयावेत. आपतकालीन व्यवस्थापन कक्षामध्ये एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-याची नेमणूक करण्यात यावी अशा सुचना त्यांनी केल्या. प्रातांधिकारी यांनी पाटण तालुक्यातील सर्व पोलीस यंत्रणांची बैठक घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
                    त्याचबरोबर त्यांनी सार्वजनीक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचेकडून तालुक्यातील प्रमुख रस्ते,ग्रामीण रस्ते,मोठे पुल,लहान मोठे पुल तसेच साकव पुलांच्या ठिकाणी कुठे अडचण तर नाही ना याचा सविस्तर आढावा घेतला यामध्ये कोठे अशा प्रकारची आपत्ती जाणवली तर तातडीने बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आपत्ती दुर करावी असे सांगून मुळगांव येथील पुलावरुन पाणी जाते त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करुन तात्काळ वाहतूक बंद करावी. वीज विभागाच्या अधिका-यांनी प्रामुख्याने जागृत रहा. विनाकारण वीज खंडीत करु नये. प्राथमिक शाळा खोल्या कुठे नादुरुस्त असतील तर शिक्षणाधिकारी यांनी संबधित शिक्षकांना सुचना करुन शाळा अंगणवाडी तसेच इतर सार्वजनीक ठिकाणी भरविण्याची व्यवस्था करावी.प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषध साठयाचाही आढावा घेत त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे असे नुकसान होणा-या पिकांचा कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना मदत मिळणेकरीता प्रस्ताव सादर करावेत.अशाही सुचना त्यांनी यावेळी केल्या.
              चौकट:- महामार्गाचे अधिकारी आणि एल अँन्ड टी कंपनीने तात्काळ उपाययोजना कराव्यात.
    कराड चिपळुण या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सध्या सुरु आहे अनेक ठिकाणी रस्त्याचा मार्ग वळविण्यात आला आहे.रस्त्याची एकच बाजु सुरु असल्यामुळे रस्त्यावर पाणी येण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डेही पडले आहेत त्यामुळे अपघाताची भिती निर्माण होत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी साठणारे पाणी काढून देणेकरीता महामार्गाचे अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीने तात्काळ उपाययोजना करावी व पावसाच्या कालावधीत कायम आपली यंत्रणा सतर्क ठेवावी अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाई यांनी महामार्गाचे अधिकारी व कंपनीच्या अधिका-यांना दिल्या.

Friday, 13 July 2018

कुंभारगांव विभागातील गावागांवात विकास पोहचविण्याचा प्रयत्न. गलमेवाडी कार्यक्रमाप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.


दौलतनगर दि.11:  २०१४ च्या निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून देत मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करीत मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेला विकास पुर्णत्वाकडे नेणेकरीता गत साडेतीन वर्षात माझे कशोसीने प्रयत्न सुरु असून अनेक कामे पुर्णत्वासही नेली आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.गत साडेतीन वर्षात कुंभारगांव विभागातील अनेक गांवामध्ये  विकास पोहचविण्याचे मी प्रामाणिक कार्य केले असून या विभागातील अनेक कामे या येत्या वर्षभरात करणेकरीता विविध योजनांमध्ये प्रस्तावित केली असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
गलमेवाडी ता.पाटण येथे राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत यंदाच्या वर्षी आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या गलमेवाडी मधली आळी अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामांचा शुभारंभ आमदार देसाई यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.या अंतर्गत कामाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य आशिष आचरे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सौ.सिमा मोरे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य बबनराव भिसे, रघूनाथ माटेकर,सुभाष चोरगे,अधिक चोरगे,सुरेश चोरगे,अजय चोरगे,सुभाष घाडगे,राजू चोरगे,अगस्त चोरगे,धोडींराम चोरगे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह जय दुर्गा माता मुंबई मित्र मंडळ,गलमेवाडी येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,गलमेवाडी मधली आळी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे या कामाची ब-याच वर्षाची मागणी होती.त्यानुसार यंदाच्या वर्षी राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत या कामांस १० लाख रुपयांचा निधी मिळणेकरीता सदरचे काम प्रस्तावित केले होते त्यानुसार शासनाने या कामांस मंजुरी दिली. शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत यंदाच्या वर्षी पाटण मतदारसंघात सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. या कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमातच या गावातील ग्रामस्थांनी आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो सोडवावा अशी मागणी केली.ग्रामस्थांनी मागणी आता केली परंतू ज्या ज्या वेळी पाटण मतदारसंघातील गावे व वाडयावस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या संदर्भात बैठका होतात तेव्हा तेव्हा गलमेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे येतो हे ओळखून कार्यक्रमाला येण्यापुर्वी व ग्रामस्थांकडून मागणी येण्यापुर्वीच या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरीता राष्ट्रीय पेयजल आराखडयात या गावाचा समावेश करण्यात यावा व आवश्यक असणारा निधी मंजुर करावा याकरीता मी याअगोदरच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे मागणी पत्र दिले असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील प्रत्येक गांव आणि वाडयांच्या प्रलंबीत विकासकामांचा मी आराखडा तयार केला आहे त्यानुसार कोणत्या गांवातील प्रलंबीत काम शासनाच्या कोणत्या योजनेमध्ये प्रस्तावित करावयाचे आणि त्याकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणायचा याचा समावेश त्या आराखडयात आहे.प्रलंबीत विकासकामांच्या तयार केलेल्या आराखडयानुसार गत साडेतीन वर्षात मतदारसंघात काम करण्याचा माझा प्रयत्न असून प्रलंबीत राहिलेली विकासकामे पुर्णत्वाकडे नेणेकरीता माझा प्रयत्न तर आहेच परंतू अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी कामे गेल्या साडेतीन वर्षात पुर्णत्वाकडे गेली आहेत याचा मला सार्थ अभिमानदेखील आहे.मतदारसंघाच्या प्रत्येक विभागाला विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचे कार्य मी केले आहे व करीत आहे.आज मतदारसंघात जाईल त्या भागात शासनाच्या विविध योजनेमधून विकासकामे सुरु असल्याचे आपणांस दिसून येत आहेत.विरोधकांना आपली कामे दिसत नाहीत ती त्यांना दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे. निवडणूका जवळ आल्या की मतदारांचा बुध्दीभेद करायचा एवढे एकच काम विरोधकांना येते त्यामुळे विरोधकांचे डावपेच ओळूखनच मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी आपआपल्या गांवामध्ये वाडीवस्तीमध्ये याअगोदरच्या लोकप्रतिनिधींनी एवढया वर्षे कोणती विकासकामे केली आणि आताच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या साडेतीन वर्षात कोणकोणती विकासकामे केली आहेत आणि कुणाच्या माध्यमातून विकासकांमे सुरु आहेत याचा सारासार विचार करुन मतदारांनीच दोन लोकप्रतिनिधींच्या कामांतील तुलना करावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.प्रास्ताविक अजय चोरगे व आभार अधिक चोरगे यांनी मानले.

Thursday, 12 July 2018

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकातील अभ्यासिका ग्रामीण भागातील मुलांना दिशा देणारी ठरेल. स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यस्मरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे प्रतिपादन.

दौलतनगर दि.12:  मी सातारा जिल्हयाला लागून असणा-या सांगली जिल्हयातीलच आहे. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे अतुलनीय कार्य संपुर्ण राज्याला माहिती आहे. त्यांच्या अनमोल कार्यामुळेच ग्रामीण भागातील मुले राज्याच्या विविध भागामध्ये चमकली असल्याचे आपण पहात आहोत त्यांचाच आदर्श त्यांचे चिरंजीव स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी घेतला आणि वाटचाल केली या दोन महान नेत्यांचा आदर्श पुढे चालविण्याचे काम या मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई करीत आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नातून याठिकाणी उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील अभ्यासिका ही या ग्रामीण भागातील मुलांना नक्कीच दिशा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
               दौलतनगर,ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या 3२ व्या पुण्यस्मरण तसेच पाटण मतदारसंघातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यीनींचा गुणगौरव सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई होते. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास 3२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण,जयंवतराव शेलार, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड,शिक्षणाधिकारी निकम यांच्यासह कारखान्याचे व शिवदौलत सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ,जिल्हा परिषद,पंचायत समितीचे सर्व सदस्य,पाटण मतदार संघातील सर्व शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
  याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले,पाटण तालुका हा गुणवंताची खाण आहे. स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने गत २५ वर्षापासून पाटण मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थींनीचा  गुणगौरव कार्यक्रम याठिकाणी होत आहे याचे सातत्य पहाता खरोखरच ही गौरवास्पद बाब आहे. या कार्यक्रमाला प्रतिवर्षी आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांना निमत्रिंत करुन त्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो हे कौतुकास्पद आहे. आमचे वेळी आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांचे हस्ते सन्मान केला जात नव्हता आपण या मतदारसंघातील गुणवंत खरोखरच भाग्यवान आहात. आय.पी.एस. तसेच आय..एस अधिकारी यांचे हस्ते आपला सन्मान होतोय आणि आम्ही कसे घडलो हे आपल्यासमोर व्यक्त करताना आपणांसही एकप्रकारे दिशा मिळणेस याची मदत होत आहे. आमदार शंभूराज देसाई यांचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्य शासनाने आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक उभारण्यास निधी दिला आज हे स्मारक उभे राहिले. या स्मारकामध्ये ग्रामीण भागातील मुलांना एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करता यावा याकरीता चांगली डिजीटल अभ्यासिका असावी हा आग्रह आमदार देसाई यांचा असल्याने एक चांगली डिजीटल अभ्यासिकाही त्यांनी निर्माण केली. ही अभ्यासिका खरोखरच या भागातील मुलांना उपयुक्त ठरेल. याचा लाभ चांगल्या प्रकारे घेण्याचे काम मुलामुंलीनी करावे. आपणा सर्व गुणवंताना प्रोत्साहन देण्याचे काम आमदार शंभूराज देसाई करीत आहेत. या प्रोत्साहानातून आपण चांगली दिशा निवडावी व आपले भविष्य उज्जवल करावे असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्याला दिशा देण्याचे खरे काम पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केले. आपण ज्या भूमित जन्मलो त्या भूमितील जनतेकरीता त्यांनी अफाट कष्ट घेतले.आपल्या तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावले पाहिजे याकरीता त्यांनी अनेक उपक्रम तालुक्यात राबविले.त्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना.साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक वाहिनी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्यावर दिली. स्व.आबासाहेबांनीही कारखान्याची जबाबदारी लिलया पेलत अल्पावधीत कारखाना कर्जमुक्त करुन सभासदांच्या मालकीचा करुन दिला. हे सर्वांत मोठे कार्य तालुक्यातील जनता आजही विसरली नाही आणि विसरणार  देखील नाही. आज त्यांचे ३२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई या दोन महान विभूतींनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे.लोकनेते व स्व.आबासाहेब यांच्या आदर्शातून व प्रेरणेतून आपण लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समुह चांगल्या प्रकारे चालविण्याचे काम करीत आहोत. दौलतनगर येथील शैक्षणिक संकुलातून आज हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत त्यामागे स्व.आबासाहेब यांची तपश्चर्या फार मोठी आहे.आजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या जीवनात लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांच्या आदर्श गुणांचा उपयोग करुन आपली शैक्षणिक वाटचाल करावी राज्य शासनाच्या निधीतून याठिकाणी उभारण्यात आलेले लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक या स्मारकातील अभ्यासिकेचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थींनी चांगल्या प्रकारे करुन घ्यावा असेही ते  शेवटी बोलताना म्हणाले, यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते तालुक्यशतील मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील 10 वी, 12 वी तील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींनी व त्यांचे पालक तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील अधिकारी,कर्मचारी,विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी केले.उपस्थितांचे आभार अशोकराव पाटील यांनी मानले.

Saturday, 7 July 2018

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे १२ जुलै रोजी विविध कार्यक्रम. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.



दौलतनगर दि. ०7:  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३२ वा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवार दि.१२ जुलै,२०१८ रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सातारा जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे सदरचा कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३२ वा पुण्यतिथी कार्यक्रम गुरुवार दि.१२ जुलै, २०१८ रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर ता.पाटण येथे आयोजीत केला आहे. स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १०.०० वा सातारा जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व रविराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पाजंली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पाटण तालुक्यातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे हस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी सकाळी १०.०० वा दौलतनगर ता.पाटण येथील स्व.शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन येथे मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकात केले आहे.
चौकट:- पुण्यतिथीनिमित्त 12 जुलैला पाटण तालुका कराड मित्रमंडळाचा कराडला सहावा वर्धापन दिन कार्यक्रम.
स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे 3२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम व कराड येथे पाटण तालुक्यातील रहिवाशी असणा-या नागरीकांकरीता स्थापन केलेल्या पाटण तालुका मित्रमंडळाचा सहावा वर्धापन दिन व गुणवंत पाल्य पुरस्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार 12 जुलै,201८ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सायं.05 वा.आतिष मंगल कार्यालय, ढेबेवाडी रोड,कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.


Friday, 6 July 2018

पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना पुरवणी मागण्यात निधीची तरतुद. साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाचा समावेश.



दौलतनगर दि. ०५: पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने या गावांना पुरसंरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी माझी सातत्याची मागणी होती.राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शासनाने पाटण मतदारसंघातील साजूर,तांबवे बौध्दवस्ती, नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या एकूण 07 गांवातील कामांना अनुक्रमे दि. 05/07/2017 व दि. 08/11/2017 रोजी शासन निर्णय पारित करुन एकूण 07 कोटी 76 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर करुन प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय पारित केला होता. त्यानुसार या सात गावातील बांधकामांकरीता नागपुर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यांमध्ये आवश्यक असणा-या निधीची तरतूद शासनाने करुन दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांव्दारे दिली आहे.
             आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की,पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना पावसाळयामध्ये कोयना धरणातून वारंवार सोडण्यांत येणा-या पाण्यामुळे कोयना नदीस पुर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होत असल्याने मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या अशा 10 गावांना कोयना नदीवर घाट व संरक्षक भिंत बांधणेच्या कामांस राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी माझी सन 2004 पासून राज्य शासनाकडे मागणी होती. या विषयासंदर्भात तत्कालीन आघाडी शासनाने केवळ आश्वासने देण्याचे काम केले त्यामुळे हा निधी इतक्या वर्षात मिळू शकला नाही परंतू सन 2014 पासून सातत्याने शिवसेना भाजप या युतीच्या शासनाकडे या विषयासंदर्भात मी पाठपुरावा सुरु केला. दरम्यान यासंदर्भात मी दि. 03/08/2016 रोजी लक्षवेधी सुचनाही विधानसभा सभागृहात मांडली त्यावेळी तात्काळ या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री यांनी मला दिले होते.मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या व पुराचा धोका निर्माण होणा-या सांगवड,बनपेठवाडी,मंद्रुळहवेली,नेरळे,गुंजाळी, गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे,साजूर व तांबवे बौध्दवस्ती या 10 गावांना कोयना नदीवर घाट व पुरसंरक्षक भिंती बांधण्यास आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीताचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो शासनाच्या मान्यते करीता सादर करुन हा निधी देणे किती आवश्यक आहे याचे गांभीर्य शासनाचे निदर्शनास आणून दिलेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी तात्काळ हा निधी मंजूर करण्यात यावा असे जलसंपदा विभागाला आदेश दिले होते.त्यानुसार अनुक्रमे दि.05/07/2017 व दि.08/11/2017 रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने निधी मंजुरीचा व या कामांना प्रशासकीय मान्यता देत असल्याचा शासन निर्णय पारित करुन एकूण १० गावांपैकी साजूर 65 लाख 27 हजार,तांबवे बौध्दवस्ती 93 लाख 97 हजार,नेरळे 83 लाख 44 हजार,गिरेवाडी 92 लाख 04 हजार, पश्चिम सुपने (थोरात मळा) 1 कोटी 1५ लाख 37 हजार, केसे 2 कोटी 15 लाख 86 हजार व मंद्रुळहवेली 01 कोटी 10 लाख 19 हजार या सात गावांना एकूण 07 कोटी 76 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार या सात गावातील बांधकामांकरीता नागपुर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये आवश्यक असणा-या निधीची तरतूद करुन दिली असून निधीच्या या तरतूदीमुळे लवकरच या बांधकामांच्या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन कामांना सुरुवात करण्यास मदत झाली आहे. तर उर्वरित सांगवड गावाकरीता 5 कोटी 43 लाख 72 हजार, बनपेठवाडी (येराड) 2 कोटी 38 लाख व गुंजाळी 3 कोटी 46 लाख 85 हजार या तीन गावांचे प्रस्ताव रक्कम रुपये २ कोटीच्या वरील असल्याने शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत असून या तिन्ही गांवाच्या कामांनाही आवश्यक असणारा निधी मंजुर करुन घेणेकरीता मी कटीबध्द आहे.असे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
चौकट :- जे ठरविले ते करुन दाखविले.
           पाटण मतदारसंघातील पुरामुळे धोका निर्माण होणा-या कोयना नदीकाठच्या गांवाना पुरसंरक्षक भिंती व घाट बांधणेकरीता आतापर्यंत पाटण मतदारसंघात कुणीही निधी आणू शकले नाही तो निधी कोणत्याही परिस्थितीत आपण शासनाकडून मंजुर करुन आणायचा हे आमदार म्हणून ठरविलेल्या आमदार शंभूराज देसाईंनी जे ठरविले ते करुन दाखविले. परंतू हा निधी मंजुर करुन आणणेकरीताचा त्यांचा पाठपुरावा खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या एकटयाच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी या गांवाना मंजुर होवू शकला आहे.


Thursday, 5 July 2018

वृक्षलागवडीचा उपक्रम दोन चार दिवसाचा नको, लोकचळवळीतून हा उपक्रम हाती घेणे गरजेचे. आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते नाडे व गलमेवाडी येथे वृक्षलागवडीचा प्रारंभ. पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिका-यांची उपस्थिती.


दौलतनगर दि. ०४:  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने गत दोन वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी दि.०१ जुलै ते ३१ जुलै अखेर संपुर्ण राज्यामध्ये १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणणे आवश्यक आहे.त्याचाच एक भाग म्हणून मागील दोन वर्षामध्ये प्रत्येकी २ कोटी व ४ कोटी वृक्षलागवड करण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या वन विभागाने केले होते तर यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले आहे. राज्य शासनाचा व शासनाच्या वन विभागाचा निर्धार पुर्णत्वाकडे नेणेकरीता वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ दोन चार दिवसाचा नको तर हा उपक्रम लोकचळवळीतून हाती घेण्याची आणि या वृक्षांची चांगल्या प्रकारे जपणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
          राज्य शासनाच्या वन विभागामार्फत यंदाच्या वर्षी दि.०१ जुलै ते ३१ जुलै अखेर करण्यात येणा-या १३ कोटी वृक्षलागवडीचा तसेच गलमेवाडी ता.पाटण ग्रामस्थ व मुंबई मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात येणा-या वृक्षलागवडीचा शुभारंभ अनुक्रमे नाडे व गलमेवाडी ता.पाटण येथे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,तालुका वन अधिकारी व्ही.आर.काळे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार,आशिष आचरे,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,सौ.सिमा मोरे,माजी उपसभापती जितेंद्र केसेकर,माजी सदस्य बबनराव भिसे, रघूनाथ माटेकर नाडे सरपंच विष्णू पवार,सुभाष चोरगे,अधिक चोरगे,सुरेश चोरगे,अजय चोरगे,सुभाष घाडगे,राजू चोरगे,अगस्त चोरगे,धोडींराम चोरगे या प्रमुख पदाधिका-यांसह पाटण तालुक्यातील शासकीय विभागांचे सर्व शासकीय अधिकारी व जय दुर्गा माता मुंबई मित्र मंडळ, गलमेवाडी येथील कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
            यावेळी दोन्ही ठिकाणच्या आयोजीत कार्यक्रमात बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, आजवर राज्य शासनाने वृक्षारोपणाचा अनेकदा कार्यक्रम हाती घेतला परंतू युतीच्या शासनाने गत दोन वर्षात एकाच आठवडयात प्रतीवर्षी अनुक्रमे दोन कोटी आणि चार कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहिम शासनाच्या वनविभागामार्फत हाती घेतली.वृक्षारोपणाची ही मोहिम म्हणजे केवळ कार्यक्रम न करता एक लोकचळवळ झाली पाहिजे.या चळवळीमध्ये मोठया प्रमाणात लोकांचा,विविध मंडळाचा,सामाजिक संस्थांचा,महाविद्यालये,शाळा,ग्रामपंचायतींचा,शासकीय कार्यालयांचा सहभाग असणे आवश्यक आहे.युतीच्या शासनाने व शासनाच्या वनविभागाने वरील सर्व यंत्रणांना वृक्षलागवडीचा नारा आणि हाक दिल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड होण्यास मदत होणार आहे.पाटण तालुक्यातील वन विभागाच्या वतीने यंदाच्या वर्षी ३ लाख ६५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्वत रांगा या आज उजाड दिसत आहेत.त्या हिरव्यागार करण्याचे काम युतीच्या शासनाने हाती घेतले असून वनखात्यांच्या जागांवरच केवळ झाडे लावणे एवढया मर्यादेत न रहाता अन्य जागांवरही तसेच खाजगी जागेमध्ये वृक्षाची लागवड केल्यास लयाला गेलेली वनसंपदा पुनश्च: उभी राहण्यास मदत होणार आहे.पाटण तालुक्यातील वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी वृक्षलागवडीच्या जागा निश्चित करुन ३१ जुलैपर्यंत मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड करावी अशा सुचना तालुका वन‍ अधिकारी यांना दिल्या आहेत त्यानुसार विविध सामाजिक संस्था यांच्या मदतीने त्यांनी मोठया प्रमाणात वृक्षलागवड करुन शासनाचे उदिष्ट पुर्णत्वाकडे नेण्याचे नियोजन केले आहे. गलमेवाडी येथील मुंबई मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने गावाकडे येणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूना वृक्षलागवड करण्याचा हाती घेतलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्य शासनाने आणलेली ही महत्वकांक्षी मोहिम महाराष्ट्रामध्ये एक चळवळ निर्माण करुन भविष्यात राज्याच्या प्रगतीला एकप्रकारे सावली मिळवून देईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त करुन केवळ वृक्षलागवड करुन थांबू नका तर केलेली वृक्षलागवड जपण्याचे ते वाढविण्याचे कामही लोकांनी लोकसहभागातून तसेच शासकीय यंत्रणांनी आणि सामाजिक संस्थांनी जबाबदारीने करावे असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. तालुका वन अधिकारी व्ही.आर.काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
चौकट :- दि.12 जुलैला दौलतनगरला होणार मोठया प्रमाणात वृक्षलागवड.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चिरंजीव लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई यांचे ३२ व्या पुण्यतिथी निमित्ताने तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर ता.पाटण येथे मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग, शिक्षण समुह व शासनाच्या वनविभागच्या वतीने करण्यात आले आहे.